
नागपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार अरुण लखानी हे अविरोध विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर कोठारी यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने या मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली.
उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर अरुण लखानी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे मतदानाची आवश्यकता न राहता त्यांची विधान परिषद सदस्यपदी अविरोध निवड निश्चित झाली आहे.
भाजपसाठी हा महत्त्वाचा राजकीय विजय मानला जात असून, महायुतीने या मतदारसंघात आपले वर्चस्व कायम राखले आहे. उद्योग क्षेत्रातील अनुभव आणि पक्ष संघटनेतील सक्रिय योगदानामुळे अरुण लखानी यांना उमेदवारी देण्यात आली होती. ते भाजपचे सह-कोषाध्यक्ष असून पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाचे विश्वासू मानले जातात.
दरम्यान, अविरोध विजयानंतर अरुण लखानी आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नागपूर येथील रामनगरस्थित त्यांच्या निवासस्थानी पोहोचणार असून, कार्यकर्त्यांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. महायुतीच्या पदाधिकारी व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.







