Published On : Wed, Mar 28th, 2018

वीजबिलाचा भरणा करून कटू कारवाई टाळण्याचे आवाहन

Advertisement

Mahavitaran Logo Marathi
नागपूर: नहावितरणतर्फ़े वीजग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी ‘शुन्य थकबाकी’ मोहीम सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे मात्र, वारंवार आवाहन करूनही अपेक्षित प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याची कारवाई येत्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या काळात अधिक आक्रमकतेने राबविण्याच्या सुचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सर्व संबंधितांना दिल्या आहेत.

चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस आलेल्या शासकीय सुट्ट्या बघता या काळात सर्व अभियंता, अधिकारी आणि कर्मचा-यांनी थकबाकी वसुलीकरिता स्वत:ला झोकून देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान खंडित वीजपुरवठ्याच्या पुनर्जोडणीसाठी ग्राहकाला वीजबिलाची रक्कम तातडीने भरता यावी यासाठी महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु ठेंवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसह सार्वजनिक पाणी पुरवठा योजना आणि पथदिव्यांच्या थकबाकीची रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याने महावितरणने जानेवारीपासून थकबाकीदारांच्या विरोधात कठोर पावले उचलली आहेत. हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करूनही अद्यापही अनेक ग्राहकांनी त्यांचेकडील थकबाकीचा भरणा केलेला नसल्याने वरिष्ठ अभियंत्यांसह अधिकारी व कर्मचा-यांनी वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची रक्कम न बघता अधिकाधिक थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडित करावा, असेही खंडाईत यांनी सांगितले आहे. थकबाकीमुळे तात्पुरता वीजपुरवठा खंडित झाल्यास थकबाकीच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क (रिकनेक्शन चार्जेस) भरणे नियमानुसार आवश्यक असून, त्यानंतरच संबंधित थकबाकीदारांचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात येणार आहे. नियमानुसार लघुदाब वर्गवारीतील सिंगल फ़ेजसाठी 50 रुपये तर थ्री फ़ेज जोडणीसाठी 100 रुपये, तर उच्चदाब जोडणीसाठी 500 रुपये अधिक वस्तू सेवा कर (जीएसटी) पुनर्जोडणी शुल्क आहे.