
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात उद्योगपती अनिल अंबानी यांना मोठा दणका दिला आहे. मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या त्यांच्या १७ मजली आलिशान निवासस्थान ‘अबोड’वर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्तेची किंमत सुमारे ३,७१६ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
ही कारवाई पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) अंतर्गत करण्यात आली असून, Reliance Communications (आरकॉम) संबंधित कथित बँक फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाशी तिचा संबंध आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने तपासाची सूत्रे हाती घेतली.
१५,७०० कोटींच्या मालमत्तांवर टाच-
ईडीच्या कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचे एकूण मूल्य सुमारे १५,७०० कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रिलायन्स समूहाशी संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, ५० पेक्षा अधिक कंपन्या तपासाच्या कक्षेत आल्या आहेत. मुंबई आणि दिल्लीतील २५ पेक्षा अधिक व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे.
दुसऱ्यांदा चौकशीची शक्यता-
६६ वर्षीय अनिल अंबानी यांची या प्रकरणात दुसऱ्यांदा चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये ते प्रथमच ईडीसमोर हजर झाले होते. त्यावेळी पीएमएलए अंतर्गत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
कर्ज वळवण्याचा आरोप-
२०१७ ते २०१९ या कालावधीत Yes Bank कडून सुमारे ३,००० कोटी रुपयांचे कर्ज घेतले गेले आणि ते शेल कंपन्यांच्या माध्यमातून अन्यत्र वळवण्यात आल्याचा संशय तपासातून व्यक्त करण्यात आला आहे. या निधीच्या प्रवाहाचा मागोवा घेण्याचे काम तपास यंत्रणांकडून सुरू आहे.
अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्यांवर फसवणूक, लाचखोरी आणि सार्वजनिक निधीचा दुरुपयोग केल्याचे आरोप आहेत. या कारवाईमुळे उद्योगविश्वात खळबळ उडाली असून, पुढील चौकशी व कायदेशीर प्रक्रिया कशा घडामोडी घडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








