Published On : Fri, Jan 17th, 2020

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा

Advertisement

विजेत्यांना मिळणार सेवाग्राम आश्रमाला भेट देण्याची संधी

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वयम् सामाजिक संस्था, माय करिअर क्लब आणि जागतिक अहिंसा दिन आयोजन समितीच्या वतीने इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘सामाजिक एकतेसाठी गांधी विचारांची गरज’ या विषयावर ही निबंध लेखन स्पर्धा घेण्यात येत असून, प्रवेश निःशुल्क आहे. स्पर्धेचा निकाल आणि विजेत्यांचा गौरव सोहळा रविवारी (ता. २ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मानवी समाजाला जगण्याचा मार्ग दाखविला. म्हणूनच अनेक देशांनी त्यांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन त्यांना विश्वगुरू मानले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्व देश भारून टाकण्याची क्षमता असलेले गांधीजींचे विचार सात दशकांनंतरही आजच्या पिढीला कालसुसंगत वाटतात. व्यक्तिगत आचरणातून त्यांनी समाजाला सत्य आणि अहिंसेचे महत्त्व पटवून दिले. देशात सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक एकता प्रस्थापित व्हावी, असे त्यांचे स्वप्न होते.

अनेक विषयांवर त्यांनी मांडलेली मते आजच्या बदलत्या काळात प्रासंगिक असल्याचे दिसून येते. आजही गांधी विचार समाजाला मार्गदर्शक ठरतात.

गांधी विचार आणि तत्त्वांचे महत्त्व नव्या पिढीला कळावे, इतिहासाच्या अभ्यासातून अनुभवसंपन्न पिढी घडावी, विद्यार्थ्यांमध्ये विचारक्षमतेसह लेखनकौशल्य विकसित व्हावे, या हेतूने या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी प्रत्येक शाळा/महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट निबंध लिहिणाऱ्या एका विजेत्याला गौरविण्यात येईल, तर प्रत्येक शाळेतील क्रमवार ३ विजेत्यांना सेवाग्राम आश्रमाला भेट देण्याची संधी मिळणार आहे.

तसेच सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या निबंध लेखन स्पर्धेत मोठ्या संख्येने शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन स्वयम् सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी केले आहे. स्पर्धेसंंबंधी अधिक माहितीसाठी ८६०५१७९१४६ किंवा ७७२००५०२४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.