Published On : Tue, Mar 24th, 2020

राज्यात 21 दिवसांच्या ‘लॉक डाऊन’च्या काळात जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू राहणार

Advertisement

नागपूर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसाचा ‘ लॉक डाऊन’ जाहीर केला असला तरी या काळात सर्व जीवनावश्यक सेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू राहणार आहे. त्यामुळे सध्या राज्यात सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या कालावधीत फक्त वाढ झाली असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे .

जनता कर्फ्यूच्या काळात तसेच राज्यात लागू असलेल्या कलम 144 च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरु राहतील. 21 दिवसाच्या ‘लॉक डाऊन’च्या घोषणेमुळे जीवनावश्यक बाबींच्या पुरवठ्यासह जीवनावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची प्रशासन काळजी घेत आहे. त्यामुळे विनाकारण दुकानात गर्दी करू नका. याबाबत पुनश्च एकदा सर्व जनतेला आश्‍वस्त करण्यात येत असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कृपया कोणीही घाबरू नये. सर्व आवश्यक ती खबरदारी घ्यावी. घराबाहेर कृपया पडू नये . कोरोनाविरोधात आपली ही अत्यंत महत्त्वाची लढाई सुरू असून सर्व जनतेने संयमाने या परिस्थितीत सहकार्य द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे