Published On : Thu, Mar 1st, 2018

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आगा खान संस्थेने सहकार्य करावे – राज्यपाल चे. विद्यासागर राव

Advertisement

मुंबई: महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यात आदिवासींची संख्या जास्त असून त्यांच्यासाठी कौशल्य शिक्षणाबरोबरच, जीवनमान उंचावण्यासाठी सर्वांगीण विकास करण्याची गरज आहे. आगा खान संस्थेने त्यासाठी सहकार्य करावे असे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले. ते आज राजभवन येथे शिया इस्माईली मुस्लिम समाजाचे इमाम आणि आगा खान संस्थेचे अध्यक्ष आगा खान यांचाशी चर्चा करताना बोलत होते.

श्री. राव म्हणाले, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी ५ टक्के आर्थिक निधी हा थेट ग्रामपंचायतीला दिला जातो. आदिवासींमध्ये अनेक कलागुण आहेत. त्यांना धनुर्विद्या प्रशिक्षण देण्यासाठी आगा खान संस्थेने मदत करावी. २०२२ पर्यंत देशातील कृषी उत्पादन दुप्पट वाढविण्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. कृषी क्षेत्राला आपल्या सहकार्याची गरज आहे. ग्रामीण भागात विविध प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवारमुळे शेकडो गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटलेला आहे. ग्रामीण भागाचा विकास, हे ध्येय समोर ठेवून शासन वेगाने काम करीत आहे. राज्यात सुरू करावयाच्या विविध कल्याणकारी योजनांना शासनाचे संपूर्ण सहकार्य आगा खान संस्थेला देण्यात येईल, असे सांगून शेवटी त्यांनी श्री. आगा खान यांचे इमाम या धर्मगुरूच्या सर्वोच्च स्थानावर ६० वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले.

श्री. आगा खान या वेळी म्हणाले, आगाखान संस्थेला ग्रामीण भागात काम करायचे आहे. शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी संस्था काम करेल. वारसा जतन करण्याच्या संदर्भात मुंबई विद्यापीठासोबत अभ्यासक्रमाची आखणी करायची आहे. संस्थेचे काम भारतातील ६ राज्यात सुरू असून शिक्षण, आरोग्य आणि जीवनमान उंचावण्याचा दृष्टीने तेथे काम सुरू आहे. महाराष्ट्राला प्राचीन अशी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. भारतात सर्व जाती धर्माचे लोक शांततेच्या मार्गाने जीवन जगतात हा जगाला मोठा संदेश आहे. शेवटी त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या भेटीच्या वेळी राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, राज्यपालांचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी उपस्थित होते.