Published On : Mon, Jul 22nd, 2019

प्रशासनाचा भोंगळ कारभार,तीन परीक्षार्थी तलाठी परिक्षेपासून वंचित

Advertisement

बुटी बोरी मधील आभा गायकवाड अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार
परिक्षेपासून वंचित ठेवल्याने विध्यार्थी ढसाढसा रडले!

नागपूर:- परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडे परीक्षा केंद्रावर प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक असलेले दस्तावेज ग्राह्य नसल्याचे कारण सांगून परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखाने परीक्षार्थी विद्यार्थाना परीक्षेला बसू न देता परिक्षेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार बुटी बोरी येथील आभा गायकवाड अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवार दि २२ जुलै ला घडला.

महाराष्ट्रराज्य महसूल विभागा अंतर्गत सातारा जिल्ह्याकरिता तलाठी पदाच्या एकूण ११४ पदाकरिता आज दि २२ जुलै ला राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.या परिक्षेकरिता राज्याच्या विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून परिक्षेकरिता पात्र ठरले होते.या परिक्षेकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी येथील पतरु वाघुजी सातघरे,यवतमाळ येथील राजेश पोमसिंग पवार व गडचिरोली येथील अभया गणेश मोगरकर या विद्यार्थ्यांनी सुद्धा तलाठी पदाचे आवेदन भरून परिक्षेकरिता पात्र झाले होते.

त्यानुसार त्यांना आज होण्याऱ्या परिक्षेकरिता बुटीबोरी येथील आभा गायकवाड अभियांत्रिकी महाविध्यालाय येथे परीक्षा केंद्र मिळाले होते.त्या अनुषंगाने उपरोक्त तीनही विध्यार्थी पेपर सुरू होण्याच्या एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहचले होते. त्यांच्या कडे परीक्षेचे प्रवेशपत्र व आधार कार्डचे स्मार्ट कार्ड होते.परंतु परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखाने आधारकार्डच्या स्मार्ट कार्डला परीक्षेला बसण्याकरिता हे शासकीय ओळखपत्र ग्राह्य नसल्याचे सांगत परीक्षार्थी विध्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित ठेवले.

विशेष म्हणजे या तिन्ही विद्यार्थ्यांनी या अगोदर आधारकार्ड हे ओळखपत्र दाखवून राज्य व केंद्रशासनाच्या अनेक परीक्षा दिल्याचे बुटी बोरी पोलीस स्टेशन ला दिलेल्या माहितीत सांगितले.त्यानुसार येथील शिपाई राठोड हे विध्यार्थ्यांना दाद मिळवून देण्याकरिता परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह गेले परंतु त्यांना शेवटी खाली हातच परत यावे लागले.शासकीय नोकरी करिता विद्यार्थ्यांनी वर्षभर रात्रंदिवस अभ्यास केला.व त्यानंतर जवळपास १०० ते १५० किमी चा प्रवास करून परीक्षेच्या १ तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहचले.त्यातल्यात्यात परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक प्रवेश प्रक्रियेच्या सुविधेचा सुद्धा अभाव होता.

त्यांच्याकडे परीक्षेच्या प्रवेशपत्रासह केंद्र शासनाचे आधारकार्ड हे ओळखपत्र असूनही जर ते परीक्षेला आवश्यक असलेले ओळखपत्र हे ग्राह्य धरण्यात येत नसेल तर अजून कुठले ओळखपत्र हवे हा प्रश्न यानिमित्याने विध्यार्थ्यांनि उपस्थित केला. व परिक्षेपासून वंचित ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांनी साश्रू नयनांनी आपल्या घराचा परतीच्या प्रवासाला लागले.परंतु परिक्षेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला व प्रशासनाला काही दंड होईल का?हा प्रश्न मात्र या निमित्ताने अनुत्तरीतच आहे.

संदीप बलविर, बुटिबोरी