Published On : Wed, Mar 24th, 2021

हरित दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांचा विकास : ना. नितीन गडकरी

Advertisement

‘हरित पायाभूत सुविधा’ विषयावर संवाद

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून आगामी पाच वर्षात 111 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा या हरित दृष्टिकोनातून उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे राष्ट्रीय राजमार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

‘नॅशनल हायवे समीट’अंतर्गत हरित पायाभूत सुविधा, या विषयावर ते संवाद साधत होते. पर्यावरण, अर्थव्यवस्था, नीती हे तीन देशाचे पिलर आहेत. देशाला सुपर इकॉनॉमिक पॉवर- बनविण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचा शासनाचा संकल्प आहे. या सुविधांचा विकास हा हरित दृष्टिकोनातून व्हावा असा प्रयत्न असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत निर्माण होणारे महामार्ग- हे हरित दृष्टिकोनातून असावे असा आमचा प्रयत्न असून तो यशस्वी होताना दिसत आहे. 22 ‘ग्रिन फिल्ड कॉरिडार’ आम्ही बनवत आहोत. या पायाभूत सुविधा प्रदूषणरहित, किंमतीत परवडणार्‍या आणि स्वदेशी तंत्राने असाव्या हे धोरण स्वीकारण्यात आले आहे, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.

चारधाम महामार्ग, रायपूर विशाखापट्टणम, बंगलोर रिंगरोड, सूरत अहमदनगर सोलापूर, खरगपूर सिरगुडी, इंदौर हैद्राबाद, हैद्राबाद विशाखापट्टणम, हैद्राबाद रायपूर, नागपूर विजयवाडा अशा अनेक कामांचा उल्लेख करताना ना. गडकरी म्हणाले- 7 लाख कोटी या कामांवर खर्च होणार आहेत. या महामार्गांमुळे वाहतुकीच्या खर्चात आणि वेळेत मोठी बचत होईल तसेच प्रदूषणही कमी होईल. क्रूड तेलाच्या आयातीवर नियंत्रण आणण्यासाठी जैविक इंधन आणि इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने वाहतुकीसाठी वापरणे आवश्यक आहे. इले. बस, इले. कार, इले. दुचाकीवर आपल्याला येण्याशिवाय पर्याय नाही. आज 81 टक्के लिथियम ऑयन बॅटरीची निर्मिती आपल्या देशात केली जाते. याशिवाय हायड्रोजन फ्यूएल सेलवर संशोधन केले जात आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

https://www.facebook.com/watch/?v=1136299036835868

‘वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन’ या चार गोष्टींचा विकास करण्याची गरज आहे. त्याशिवाय औद्योगिक क्षेत्राचा विकास होणार नाही. आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाशिवाय उद्योगांमध्ये भांडवल गुंतवणूक होणार आणि भांडवल गंतवणूक झाल्याशिवाय रोजगार निर्मिती होणार नाही. रोजगारनिर्मितीशिवाय गरिबी दूर करता येणार नाही, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून महामार्गांमध्ये बांधकामात स्टील आणि सिमेंटऐवजी रबर, प्लास्टिक अशा पर्यायी वस्तूंच्या वापरावर आपण लक्ष केंद्रित केले आहे.

ज्यूट आणि कॉयरच्या जाळ्या महामार्ग बांधकामात वापरण्यात येणार असून महामार्गांच्या शेजारी क्रॅश बॅरिअरसाठी बांबूचा उपयोग करण्यात येणार आहे. याशिवाय रस्ते, महामार्गांचे बांधकाम करताना जलसंधारण कसे होईल याकडेही आमचे लक्ष आहे. बुलडाणा पॅटर्नचा उल्लेख ना. गडकरी यांनी यावेळी आवर्जून केला.