नागपूर,: नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्तांच्या सभा कक्षामध्ये सोमवारी (ता. १६) टास्क फोर्सची बैठक मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेत पार पडली. यावेळी शहरातील आरोग्य आणि लसीकरणविषयी व ‘स्टॉप डायरिया कॅम्पेन’ विषयी माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी त्यांनी बालकांच्या लसीकरणावर भर देत व दूषित पाणी असलेल्या भागांमध्ये लक्ष देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत मनपाच्या प्रजानन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. गजेंद्र महल्ले, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शीतल वंदिले, डॉ. सुलभा शेंडे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. सुनील कांबळे, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. गजानन पवाने, डॉ. अतीक खान, पीएचएन अर्चना खाडे, लायन्स क्लबचे श्री. बलबीर सिंग विज यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक व प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत सर्वप्रथम प्रजानन व बालकल्याण अधिकारी डॉ सरला लाड यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे झोननिहाय करण्यात आलेल्या नियमित लसीकरणाची स्थिती मांडली. नवजात बालकांपासून ते गरोदर मातांना विविध प्रकारचे लसीकरण केले जात असल्याचे सांगत या लसींपासून कुणीही माता आणि बालक वंचित राहू नये यावर भर देण्यात आला. जास्तीत जास्त ठिकाणी जाऊन वंचित बालकांचे लसीकरण करण्याची गती वाढविणे असे निर्देश श्रीमती वसुमना पंत यांनी यावेळी दिले.
यानंतर ‘स्टॉप डायरिया कॅम्पेन’ विषयी चर्चा करण्यात आली. ही मोहीम ०२ जून २०२५ ते ३१ जुलै २०२५ या दरम्यान राबविण्यात येत आहे. त्यानुसार १६ जून पासून हा कार्यक्रम लागू करण्यात आला आहे. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर आणणे हे या मोहिमेचे ध्येय आहे. ‘अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएसची घेऊनी साथ’ हे या मोहिमेचे घोषवाक्य आहे. या मोहिमेदरम्यान मनपाच्या आरोग्य विभागातर्फे झोननिहाय ठिकठिकाणी जाऊन ओआरएस आणि झिंक चे वाटप करण्यात येत आहे. तसेच झोपडपट्ट्या,वीटभट्टी व पूरग्रस्त भागात जाऊन दुर्बल घटकांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध आणि व्यस्थापनेसाठी पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. मनपातर्फे सर्वत्र निर्जंतुकीकरण व स्वच्छतेचे महत्व सांगण्यात येत आहे.मनपाच्या आरोग्य विभागातर्फे शाळा- शाळांमध्ये जाऊन हात धुण्याचे प्रात्यक्षिके, स्वच्छतेचे महत्व, ओआरएस ची माहिती देण्यात येणार आहे. याच्या उपाययोजनेअंतर्गत सर्वत्र स्वच्छता ठेवावी, दूषित पाणी असलेल्या भागांमध्ये लक्ष द्यावे, पिण्याच्या पाण्याची तपासणी करून त्याचे रिपोर्ट द्यावे असे निर्देश यावेळी श्रीमती पंत यांनी अधिकाऱ्यांना दिले.