Published On : Wed, Jun 12th, 2019

शहराचे नाव लौकीक करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करा!

Advertisement

महापौर नंदा जिचकार : मृत ऐवजदार सफाई कामगारांच्या वारसदारांना ऐवजीकार्ड प्रदान

नागपूर: शहराच्या स्वच्छतेमध्ये सफाई कामगारांचे महत्वाचे योगदान आहे. शहर स्वच्छतेच्या बाबतीत महानगरपालिकेने मिळविलेले यश हे सफाई कामगारांच्या कार्याची फलश्रुती आहे. प्रामाणिकपणे कार्य करून आपल्या शहराचे नाव लौकीक करणा-या वाड-वडीलांच्या कार्याचा आदर्श घेउन आपले शहर स्वच्छ भारत मिशनमध्ये क्रमांक एक वर यावे यासाठी त्याच विश्वासाने व प्रामाणिकपणे कार्य करा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी नव्याने मनपाच्या सेवेत रुजू होणा-या ऐवजदार सफाई कामगारांना केले.

नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत मृत ऐवजदार सफाई कमागारांच्या वारसदारांना बुधवारी (ता.१२) महापौर नंदा जिचकार यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या हस्ते ऐवजीकार्ड प्रदान करण्यात आले. यावेळी महापौर नंदा जिचकार बोलत होत्या. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात आरोग्य समिती सभापती मनोज चापले, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, विभागीय अधिकारी रोहिदास राठोड, राजेश हाथीबेड, एसबीएम विकास संस्थेचे अध्यक्ष सतीश सिरसवान व सर्व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.

मनपातील एकूण ३२७ मृत ऐवजदार सफाई कमागारांच्या वारसदारांना ऐवजीकार्ड प्रदान करण्यात येणार आहे. कागदपत्रांची पूर्तता असलेल्या ७० पेक्षा अधिक वारसदारांना बुधवारी (ता.१२) मान्यवरांच्या हस्ते ऐवजीकार्ड वितरीत करण्यात आले आहेत. तर उर्वरित वारसदारांना संबंधित झोन कार्यालयामधून ऐवजीकार्ड प्रदान करण्यात येणार आहेत.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, ऐवजदार सफाई कर्मचा-यांच्या कुटूंबियांच्या समस्या लक्षात घेता शासनाने पुढाकार दाखविला व त्या कार्याला यश आले आहे. शासन आपणा सर्वांच्या सदैव पाठीशी आहे. समाजातील तळागाळातील लोकांना न्यास मिळावा यासाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारावर शासन कार्य करीत आहे, असेही त्या म्हणाल्या.

अनेक वर्षांच्या प्रयत्नाला यश : संदीप जोशी
ऐवजदार सफाई कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबाची होणारी अवस्था लक्षात घेता त्यांच्या वारसदाराला ऐवजदार सफाई कर्मचारी म्हणून रुजू करावे यासाठी अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रयत्न सुरू होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वेळोवेळी दखल घेतली. प्रशासनातर्फेही आयुक्तांनी योग्य निर्णय घेउन हे कार्य पूर्णत्वास नेले व अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आले आहेत, असे सांगत सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मनपा आयुक्तांचेही अभिनंदन केले.

ऐवजदार सफाई कामगारांच्या वारसांना सेवेत घेण्यात यावे यासाठी माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी व आपण स्वत: सभागृहामध्ये भूमिका मांडत आलेलो आहोत. यामध्ये येणा-या अडचणी सोडवून प्रशासनाने अखेर सेवेत नियुक्तीचा मार्ग मोकळा केला आहे, असेही सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सांगितले. आज आपल्या नागपूर शहरामध्ये सुमारे पाच हजार सफाई कामगार व सुमारे चार हजार ऐवजदार सेवेत आहेत. मात्र शहरात स्वच्छतेबाबत येणा-या तक्रारी लक्षात घेता सर्वांनी ठरवून दिलेल्या वेळेवर शंभर टक्के काम करून कोणत्याही तक्रारीची संधी देउ नये. शिवाय आपल्या शहराचे आरोग्य आपल्याच हातात असल्याने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.