
नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. ‘सीजेपी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्वतः आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा करत २० जुलै रोजी नियोजित संसद मोर्चा कोणत्याही परिस्थितीत काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवून आंदोलन संपेल, असा सरकारचा समज असल्याची टीका करत दिपके म्हणाले, “आजपासून मी आमरण उपोषण सुरू करत आहे. २० जुलैचा संसद मोर्चा नियोजित वेळेनुसार निघेल आणि आमचा लढा सुरूच राहील.”
यावेळी त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आपल्याला मारहाण केली तसेच सोनम वांगचुक यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोपही दिपके यांनी केला.
दरम्यान, सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर जंतर-मंतर परिसरातील आंदोलनकर्त्यांनाही पोलिसांनी हटवले. या कारवाईविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला.
यापूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीची गंभीर दखल घेत प्रशासनाला त्यांच्या आरोग्यावर दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले होते. कोणत्याही नागरिकाचा जीव सर्वोच्च असल्याचे नमूद करत, आवश्यक उपचार आणि नियमित तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिले होते.
शुक्रवारी वांगचुक यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सलग २० दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले होते. उपोषणामुळे त्यांचे वजन लक्षणीयरीत्या घटले असून शरीरातील ऊर्जा साठा कमी झाल्याने महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होण्याचा धोका असल्याचा इशाराही डॉक्टरांनी दिला होता.




