नागपूर : आरोग्य मंत्रालयाच्या भोंगळ कारभारामुळे आधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले. गडचिरोली व बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीदरम्यान दोन महिलांचा मृत्यू झाला.याप्रकरणी केवळ आरोग्य खात्याचा हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला.
तसेच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. इतकेच नाही आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करत वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला .विधानसभेत प्रशोत्तराच्या तासादरम्यात झालेल्या चर्चेत वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागावर ताशेरे ओढले.
गडचिरोली शहरातील जिल्हा स्त्री व बालरूग्णालयात सिझेरियन प्रसुतीनंतर रजनी प्रशांत शेडमाके व उज्वला नरेश बुरे या दोन महिलांचा डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे महिलांचा मृत्यू झाला.
बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालय व अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही ठिकाणी उपचारासाठी आलेल्या विद्या निलेश गावंडे या तरुणीलाही डॉक्टरांच्या चुकीमुळे जीव गमवावा लागल्याचे वडेट्टीवार म्हणाले. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता संबंधित विभागावर कडक कारवाईची मागणीही त्यांनी केली.