
नागपूर : शहरातील अंबाझरी तलाव मार्गावर शुक्रवारी दुपारी मोठा अनर्थ टळला. घाटे रेस्टॉरंट परिसरात रस्त्याच्या कडेला उभा असलेला एक विशाल वृक्ष अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही घटना घडली त्यावेळी रस्त्यावर वाहनांची व नागरिकांची वर्दळ सुरू असल्याने मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, संबंधित वृक्षाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली होती. याबाबत अनेक वेळा संबंधित विभाग व प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, वेळेत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, वृक्ष कोसळताना मोठा आवाज झाला आणि काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जर त्यावेळी रस्त्यावर अधिक गर्दी असती, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती.
घटनेनंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. माहिती मिळताच संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पडलेला वृक्ष हटवून मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले.
दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. वारंवार सूचना व तक्रारी करूनही धोकादायक वृक्षांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.








