मुंबई : शिवसेनेच्या ५९ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजप नेतृत्वावर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी थेट आरोप केले. त्यांनी भाजपवर “मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट” रचल्याचा पुनरुच्चार केला आणि मराठी जनतेवर हिंदी लादण्याचा आरोपही केला. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट पलटवार करत उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
बावनकुळे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (Twitter) हँडलवरून लिहिलं,उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण पराभवाच्या भीतीतून उगाळलेलं एक लाचार प्रलाप होतं. जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा ओरड सुरू होते – काल त्यांनी तेच केलं.
ते पुढे म्हणाले,शिवसेना संपली नाही’ असं म्हणता म्हणता उद्धवजी, तुम्ही स्वतःच ‘सेना’ गमावली. ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ या दोन शक्तिशाली स्तंभांनाही तुम्ही सोडलं आणि काँग्रेसच्या चरणी नतमस्तक झालात.
बावनकुळे यांनी असा सवालही उपस्थित केला की,
मुंबई आमची आहे” असं म्हणणाऱ्यांनी आधी हे सांगावं की मुंबईतील मराठी जनतेसाठी त्यांनी सत्ता असताना नेमकं काय केलं? झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन, पाणी, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मूलभूत गोष्टींसाठी त्यांनी काय पावलं उचलली?
ते पुढे म्हणाले,मुंबईसाठी कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, क्लस्टर डेव्हलपमेंट, झोपडपट्टी पुनर्विकास योजना हे सर्व फडणवीस यांच्या पुढाकारामुळे शक्य झालं, हे मुंबईकर जाणून आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्षांनी आणखी टीका करत म्हटलं,
“जेव्हा मोदी, शहा आणि फडणवीस संपूर्ण देशभरात फिरून जनतेच्या समस्या जाणून घेत होते, तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून ऑनलाइन भाषणं देत होते. ही गोष्ट महाराष्ट्राने पाहिली आहे.”
बावनकुळे यांनी ठामपणे सांगितलं,
“तुम्ही ‘मुंबई आमची’ असं ओरडत राहा, पण मुंबईच्या विकासासाठी, सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी मुंबईकर भाजप-महायुतीलाच पसंती देतील – हीच खरी मुंबईकरांची भावना आहे.”
उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका करताना ते म्हणाले,
उद्धवजी, तुम्ही विष उगाळत राहा, उपरोध करत राहा, टोमणे मारत राहा.कारण पुढचं आयुष्य तुमचं हे असंच चालेल. जनसेवा करण्याची तळमळ तुमच्यात नाही, आणि ही गोष्ट महाराष्ट्र जनतेने आधीच ओळखली आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता त्यावर ठाम शिक्का मारेल.