महाविकास आघाडी सरकारचा राज्याचा पहिला अर्थसंकल्प हा शेतकरी, महिला, विद्यार्थी, बेरोजगार व सर्व सामान्य जनतेचे हित जोपासणारा तसेच उद्योग, शिक्षण, शहरी-ग्रामीण विकास, सामाजिक न्याय, पर्यटन, क्रीडा व वैद्यकीय क्षेत्राचा विकास करणारा आहे.
८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना देण्यासाठी कायदा, सुशिक्षित बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम, उद्योगधंद्यांना सवलत, केंद्राची वाट न बघता राज्य सरकारची शेतकऱ्यांना मदत, पिकासाठी कर्ज घेतलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी वन-टाईम सेंटलमेंटची योजना, महिला सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक, मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट देऊन बांधकाम व्यवसायाला चालना, गरजूंना फक्त १० रुपयांत शिवभोजन योजना अशा अनेक तरतुदींमुळे हा अर्थसंकल्प सर्व समावेशक आहे. आमदार विकासनिधीत वाढ केल्यामुळे याचा फायदा जनतेला होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने १०० दिवस यशस्वीरीत्या पूर्ण केले असून सर्वसामान्य जनतेच्या हिताचा व विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार व कॉंग्रेसचे युवा नेते डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.