Published On : Fri, Nov 29th, 2019

‘ हे माझं सरकार ’ अशी भावना जनतेच्या मनात निर्माण व्हावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

– मंत्रालयात पदभार स्विकारला, सचिवांशी संवाद

मुंबई : ‘हे माझं सरकार ’ अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण व्हावी असे काम करा. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करूया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मंत्रालयात राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्विकारला. त्यानंतर ते विविध विभागांच्या सचिवांशी बैठकीत संवाद साधताना बोलत होते.

Gold Rate
12 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,100 /-
Gold 22 KT ₹ 1,02,400 /-
Silver/Kg ₹ 1,28,300/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या कार्यालय प्रवेशासाठी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री दालन फुलांनी सजविण्यात आले होते. प्रवेशाप्रसंगी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे तसेच मुख्यमंत्री कार्यालयाच्या महिला अधिकाऱ्यांनी औक्षण करून स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री ठाकरे यांच्या समवेत मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार दिवाकर रावते आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे, प्रधान सचिव भूषण गगराणी आदींनी प्रशासनाच्यावतीने स्वागत केले.

यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विविध विभागांच्या सचिवांशी संवादही साधला. ‘राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी प्रशासनाची जोड मिळाल्यास प्रगती होते. त्यामुळे जनतेच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील राहू या, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले

Advertisement
Advertisement