नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने देशात इंधन संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीत मोठी कपात जाहीर केली आहे. पेट्रोलवरील एक्साईज 13 रुपयांवरून कमी करून 3 रुपये करण्यात आली असून, डिझेलवरील एक्साईज ड्युटी पूर्णतः शून्यावर आणण्यात आली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे कंपन्यांना जादा खर्च सहन करावा लागत होता. त्यामुळे त्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राज्य सरकारांचा व्हॅट कायम असल्यामुळे सामान्य ग्राहकांना तत्काळ दरकपातीचा लाभ मिळेलच असे नाही.
दरात घट होणार का? या करकपातीचा थेट फायदा ग्राहकांना मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. सरकारी सूत्रांनुसार, सध्याच्या परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ग्राहकांना सध्या तरी दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
महानगरांतील दर कायमच उंचावलेले देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर अद्याप उच्च पातळीवर आहेत. मुंबईत पेट्रोल ₹103.54 आणि डिझेल ₹90.03 प्रति लिटर आहे. दिल्लीत पेट्रोल ₹94.77 तर डिझेल ₹87.67 आहे. चेन्नईत पेट्रोल सुमारे ₹101 पर्यंत, तर डिझेल ₹92 च्या आसपास आहे. लखनऊमध्येही पेट्रोल ₹94 च्या पुढे असून डिझेल ₹88 च्या आसपास आहे.
खासगी कंपन्यांची दरवाढ दरम्यान, खासगी क्षेत्रातील ‘नायरा एनर्जी’ने अलीकडेच पेट्रोलमध्ये 5 रुपये आणि डिझेलमध्ये 3 रुपयांची वाढ केली आहे. सरकारी मदतीचा अभाव आणि वाढता खर्च यामुळे दरवाढ करावी लागल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. देशभरात या कंपनीचे सुमारे 6,900 पेक्षा जास्त पेट्रोल पंप आहेत.
सरकारकडून स्पष्टता; साठा पुरेसा काही शहरांमध्ये इंधनासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, केंद्र सरकारने देशात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









