
नागपूर : देशातील लोकप्रिय कुकिंग रिअॅलिटी शो मास्टर शेफ इंडिया च्या नवव्या पर्वाचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. या स्पर्धेत नागपूरचे विक्रम आणि अजिंक्य गंधे या मराठमोळ्या भावांनी शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. त्यांच्या उत्कृष्ट पाककौशल्यामुळे आणि कल्पक सादरीकरणामुळे त्यांनी परीक्षकांची मने जिंकत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या यशामुळे नागपूरसह महाराष्ट्रात त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्पर्धेदरम्यान गंधे बंधूंनी पारंपरिक भारतीय पदार्थांना आधुनिक शैलीत सादर करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या उत्कृष्ट टीमवर्क आणि नावीन्यपूर्ण रेसिपींमुळे ते सुरुवातीपासूनच प्रेक्षक आणि परीक्षकांच्या पसंतीस उतरले होते. या सीझनचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध शेफ विकास खन्ना,रणवीर बेरार आणि कुणाल कपूर यांनी भूमिका बजावली.
विजेतेपद मिळाल्यानंतर विक्रम आणि अजिंक्य गंधे यांना ट्रॉफीसोबत २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘गोल्डन अप्रॉन’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अंतिम सोहळ्यात प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनीही विशेष उपस्थिती दर्शवली.
गंधे बंधूंची पार्श्वभूमी-
विक्रम गंधे (३१) यांनी नागपूरमधील सिटी प्रीमियर कॉलेजमधून वाणिज्य शाखेत शिक्षण घेतले आहे, तर अजिंक्य गंधे (२९) यांनी आर्किटेक्चरची पदवी मिळवली आहे. स्वयंपाकाची आवड असल्यामुळे त्यांनी पुढे स्वतःचा कॅफे सुरू केला. या आवडीमुळेच त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत सहभाग घेतला आणि अखेर विजेतेपद मिळवत मोठी कामगिरी करून दाखवली.








