
सोलापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पीककर्ज माफी योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र या योजनेचे काही ठराविक निकष असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट होत आहे.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आकडेवारीनुसार सध्या जिल्ह्यात सुमारे २४ हजार शेतकरी कर्जाच्या थकबाकीत आहेत.
या थकबाकीची रक्कम सुमारे ३६२ कोटी रुपये इतकी आहे. दुसरीकडे जवळपास ९० हजार शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करणारे आहेत. सरकारच्या निर्णयानुसार या दोन्ही गटांतील जवळपास एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळू शकतो, असा अंदाज बँक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र अंतिम लाभार्थींची संख्या सरकारच्या अधिकृत निकषांवर ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जावर दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करत आहेत, त्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र ज्यांचे पीककर्ज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम प्रथम बँकेत जमा करावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
सोलापूर जिल्हा बँकेतील कर्जदारांची स्थिती-
थकबाकीदार शेतकरी : २४,०००
एकूण थकबाकी : ३६२ कोटी रुपये
नियमित कर्जदार : ९०,२००
‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफी-
सरकारची कर्जमाफी फक्त पीककर्जासाठीच लागू असल्यामुळे काही शेतकरी या योजनेबाहेर राहण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांकडे पीककर्जासोबत दीर्घ मुदतीचे किंवा मध्यम मुदतीचे कर्ज देखील आहे. अशा परिस्थितीत पीककर्ज नियमित असले तरी इतर कर्ज थकीत असल्यास त्या शेतकऱ्याला नियमित कर्जदार म्हणून गणले जात नाही.
तसेच सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे नागरिक आणि मोठे लोकप्रतिनिधी यांनाही कर्जमाफीसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते. राज्य सरकारकडून अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर झाल्यानंतरच किती शेतकरी या योजनेस पात्र ठरणार, याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.








