
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (६ मार्च) महाराष्ट्राचा महत्त्वाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी २ वाजता महाराष्ट्र विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ते अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सभागृहात दाखल झाले.
यंदाच्या अर्थसंकल्पात शेती, पायाभूत सुविधा, उद्योग, रोजगार आणि सामाजिक योजनांबाबत महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्यात वाढ होणार का, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. तसेच महागाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मदत, पायाभूत विकास प्रकल्पांसाठी निधी आणि नव्या योजनांची घोषणाही अपेक्षित आहे.
दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे ७.९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच ३१ टक्के वाट्यासह थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
आज सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पातून राज्याच्या विकासासाठी कोणते नवे निर्णय आणि योजना जाहीर होतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








