मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी ट्विट करत अर्थसंकल्पाच्या महत्त्वावर भाष्य केले आहे. अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा ताळेबंद नसून तो प्रत्येकाच्या भविष्याचा आराखडा असतो, असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले.
ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तरुणांच्या स्वप्नांपासून ते ज्येष्ठांच्या अपेक्षांपर्यंत, तसेच शेतकरी, कामगार, नोकरदार आणि उद्योजक अशा समाजातील प्रत्येक घटकाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे असते. त्यामुळे अर्थसंकल्प केवळ ऐकण्यापुरता मर्यादित न ठेवता तो समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्प अधिक सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजावून सांगणारे आपले पुस्तक वाचण्याचे आवाहनही त्यांनी केले. उद्या सादर होणारा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करत त्याची तयारी आजपासूनच सुरू करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना केले आहे.









