
नागपूर– यंदाची होळी २०२६ अनेक ज्योतिषीय योगांमुळे विशेष ठरणार आहे. फाल्गुन पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणावर यावेळी भद्रा आणि चंद्रग्रहणाचे सावट असल्याने सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. होलिका दहन नेमके कधी करावे आणि धुलिवंदन कोणत्या दिवशी साजरे करावे, याबाबत वेगवेगळ्या पंचांगांत भिन्न मतप्रवाह दिसून येत आहेत.
पौर्णिमा तिथी २ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होऊन ३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी समाप्त होणार आहे. याच काळात भद्राही २ मार्चच्या सायंकाळपासून ३ मार्चच्या पहाटेपर्यंत प्रभावी राहणार आहे. त्यामुळे २ मार्चच्या प्रदोषकाळात होलिका दहन करणे शास्त्रानुसार टाळावे, असे अनेक विद्वानांचे मत आहे.
३ मार्च २०२६ रोजी चंद्रग्रहण देखील राहणार असून सुतक काळ सकाळपासून सायंकाळी ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत असेल. ग्रहणाचा मोक्ष सायंकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी होईल. त्यामुळे सुतक संपल्यानंतरच होलिका पूजन आणि दहन करणे श्रेयस्कर मानले जात आहे.
ज्योतिषांच्या मते ३ मार्च रोजी सूर्यास्तानंतरचा प्रदोषकाळ भद्रामुक्त आहे आणि सुतकही त्या वेळेनंतर समाप्त होत असल्याने हा काळ सर्वात अनुकूल ठरतो. सूर्यास्त सायंकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी होत असून त्यानंतर होलिका दहन करता येईल. त्यामुळे अनेक विद्वान ३ मार्च रोजी संध्याकाळी होलिका दहन आणि ४ मार्च रोजी धुलिवंदन साजरे करण्याची शिफारस करत आहेत.
काही पंचांगांमध्ये २ मार्चचा उशिराचा मुहूर्त दिला असला तरी भद्रेच्या प्रभावामुळे त्याबाबत मतभेद आहेत. धर्मग्रंथांनुसार भद्राकाळात फाल्गुनी होळी जाळणे टाळावे, असे स्पष्ट सांगितले आहे. म्हणूनच ‘भद्रामुक्त प्रदोष’ हा सर्वात शुभ काळ मानला जातो.
यंदा ग्रहण आणि भद्रा या दुहेरी योगामुळे पंचांगांमध्ये मतभेद निर्माण झाले असले तरी सर्वसाधारणपणे ३ मार्च २०२६ रोजी सूर्यास्तानंतर होलिका दहन आणि ४ मार्च रोजी रंगांची धुलिवंदन साजरी करणे अधिक योग्य ठरेल, असा निष्कर्ष बहुतेक ज्योतिषांनी नोंदवला आहे.








