
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे १ मार्च २०२६ रोजी एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत नऊ अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
उपचारादरम्यान आणखी एका जखमी कामगाराचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा आता १९ वर पोहोचला आहे. स्फोटानंतर लागलेल्या प्रचंड आगीमुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला होता.
या प्रकरणी कंपनीच्या २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएनएस कलम १०५ अंतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून मालक, संचालक, प्लांट मॅनेजर तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. अटकेतील नऊ जणांव्यतिरिक्त इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.
घटनास्थळी राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी भेट देत अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्फोटाच्या कारणांचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले असून जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारकडूनही प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
तपास पूर्ण झाल्यानंतर जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.








