
मुंबई – राज्यातील ग्रामीण भागातील सत्तासमीकरणे बदलणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची अखेर घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यामुळे राज्यातील १२ जिल्ह्यांत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ज्या जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, त्या ठिकाणी निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या १२ जिल्ह्यांत होणार जिल्हा परिषद निवडणुका
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
प्रत्येक मतदाराला दोन मते-
या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते देता येणार आहेत. एक मत जिल्हा परिषदेसाठी, तर दुसरे मत पंचायत समितीसाठी असणार आहे. नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून ती महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर राबवली जाईल.
जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक-
राखीव जागांसाठी उमेदवारांना जातप्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास जातपडताळणी समितीकडे अर्ज केल्याची सत्यप्रत द्यावी लागणार आहे. निवडीनंतर सहा महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवारी रद्द होण्याची तरतूद करण्यात आली आहे.
निवडणूक वेळापत्रक-
नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे: १६ ते २१ जानेवारी २०२६
छाननी: २२ जानेवारी
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत: २७ जानेवारी
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: २७ जानेवारी, दुपारी ३.३० नंतर
मतदान: ५ फेब्रुवारी २०२६
मतमोजणी: ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी १० वाजल्यापासून
या घोषणेमुळे ग्रामीण महाराष्ट्रातील राजकारण तापणार असून, स्थानिक पातळीवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे.








