Published On : Fri, Jun 27th, 2025
By Nagpur Today Nagpur News

एअर इंडिया विमान अपघात प्रकरणात महत्त्वाची माहिती उघड; ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळवण्यात यश

Advertisement

अहमदाबाद – एअर इंडिया विमान अपघाताच्या तपासात मोठी प्रगती झाली असून, अपघातस्थळी सापडलेल्या ‘ब्लॅक बॉक्स’मधील महत्त्वाचा डेटा मिळवण्यात तपास यंत्रणांना यश मिळालं आहे. या डेटाच्या आधारे अपघाताचं नेमकं कारण शोधण्याच्या दिशेने हालचाल वेगाने सुरू झाली आहे.

तपासात मोठी घडी-
२४ जून रोजी अपघातग्रस्त विमानातील ‘क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल’ (Crash Protection Module – CPM) काळजीपूर्वक वेगळं करण्यात आलं. त्यानंतर २५ जूनला त्यातील मेमरी युनिट अॅक्सेस करून संपूर्ण माहिती एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या प्रयोगशाळेत डाउनलोड करण्यात आली.

Gold Rate
27 June 2025
Gold 24 KT 96,400 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver/Kg 1,07,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सध्या कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) मधील माहितीचे बारकाईने विश्लेषण सुरू असून, ही माहिती अपघाताचं मूळ कारण शोधण्यासाठी मोलाची ठरणार आहे.

तपासाचा हेतू-
नागरी उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या तपासाचा उद्देश केवळ अपघाताची कारणमीमांसा करणं एवढाच नाही, तर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सुधारणा करता यावी हा देखील मुख्य हेतू आहे. विमान वाहतुकीतील सुरक्षा अधिक बळकट करण्यावरही भर दिला जाणार आहे.

‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजे नेमकं काय?
‘ब्लॅक बॉक्स’ हे विमानात असलेलं एक अत्यंत महत्त्वाचं उपकरण आहे, जे संपूर्ण उड्डाणादरम्यान घडणाऱ्या तांत्रिक आणि मानवी घडामोडींची नोंद ठेवतं.
याचे दोन भाग असतात –

फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) – वेग, उंची, दिशा, इंजिनची स्थिती यांसारख्या माहितीची नोंद करतो.

कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) – पायलट आणि को-पायलट यांचं संभाषण, तसेच कॉकपिटमधील इतर ध्वनी रेकॉर्ड करतो.

हे यंत्र अपघाताच्या तीव्रतेला तोंड देऊ शकेल अशा प्रकारे मजबूत बनवलेलं असतं, त्यामुळे भीषण धडक, आग किंवा पाण्यातील दाब यांना देखील ते टिकावू ठरतं.डेटा विश्लेषण पूर्ण झाल्यावर AAIB सविस्तर अहवाल सादर करणार आहे, ज्यामध्ये अपघाताच्या मूळ कारणांसह भविष्यातील सुरक्षा उपायांची शिफारस केली जाईल. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असून, निष्कर्ष काय लागतो याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

Advertisement
Advertisement