Published On : Fri, Jun 27th, 2025
By Nagpur Today Nagpur News

हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार; ५ जुलैला मुंबईत संयुक्त मोर्चा

Advertisement

मुंबई – राज्यातील हिंदी भाषा सक्ती आणि त्रिभाषा सूत्राच्या विरोधात आता राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येऊन हिंदी सक्तीविरोधात संयुक्त मोर्चा काढणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली असून, ५ जुलै रोजी मुंबईत एकत्र मोर्चा निघणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पूर्वी राज ठाकरे यांचा मोर्चा ५ जुलैला आणि उद्धव ठाकरे यांचा ७ जुलैला नियोजित होता. मात्र, दोन वेगवेगळ्या मोर्चांपेक्षा एकच ठोस आंदोलन प्रभावी ठरेल, असा आग्रह मनसेकडून होता. अखेर या मागणीला प्रतिसाद देत शिवसेनेने एकत्रित मोर्चाला होकार दिला आहे.

Gold Rate
27 June 2025
Gold 24 KT 96,400 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver/Kg 1,07,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या राजकीय एकत्रीकरणावर ठाकरे बंधूंचे मामा चंदूमामा वैद्य यांनी आपली भावना व्यक्त केली. “ही आनंदाची गोष्ट आहे. मराठीसाठी हे दोघं एकत्र येणं ही काळाची गरज होती. शेवटी दोघेही माझे भाचे आहेत, त्यामुळे मामा म्हणून आनंद वाटतो. मी राजकारणात नाही, पण मराठीसाठी एकत्र आले तर माझा पूर्ण पाठिंबा आहे,” असे त्यांनी सांगितले.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही संजय राऊत यांच्या घोषणेला सकारात्मक प्रतिसाद दिला. “मराठी माणसाची एकजूट ही काळाची गरज आहे. मराठी भाषा ही कोणत्याही पक्षाच्या वरची आहे. हिंदी सक्तीविरोधात आपण एकत्रितपणे उभं राहिलं पाहिजे. राज ठाकरे यांचे आवाहन सर्वांनी स्वीकारले, हे स्वागतार्ह आहे,” असे ते म्हणाले.

या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे. आता ५ जुलैचा मोर्चा हा केवळ भाषेचा लढा न राहता, मराठी अस्मितेचा एकजूट आवाज ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.

Advertisement
Advertisement