नागपूर – सतरंजीपुरा आणि दही बाजार परिसरात मागील अनेक महिन्यांपासून उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. हे काम महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (MRIDC) मार्फत राबवले जात आहे. मात्र, या कामामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याच्या मध्यभागी सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा वाढला असून, परिसरात अपघाताचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर गेले आहे. रहदारी विस्कळीत झाल्याने लोकांच्या दैनंदिन प्रवासावर मोठा परिणाम होत आहे.
‘नागपूर टुडे’ने या समस्येवर प्रकाश टाकत नागरिकांच्या अडचणी मांडल्या होत्या. त्या वृत्ताची दखल MRIDC ने घेतली असून, संस्थेने आता रस्त्याच्या कडेला बॅरीकेट्स बसवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहनचालकांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी ‘नागपूर टुडे’च्या हस्तक्षेपाचे स्वागत करत, उर्वरित काम सुरळीत आणि वेळेत पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.