यवतमाळ/उमरखेड :सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्ष सोडून जाणाऱ्या “बिकाऊ” कार्यकर्त्यांपेक्षा पक्षाशी निष्ठावान, “टिकाऊ” कार्यकर्त्यांची गरज अधिक आहे, असा स्पष्ट सल्ला माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी दिला.
तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उमरखेड शहरातील राजस्थानी भवनमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते अध्यक्षीय भाषण करत होते. येत्या नगर परिषद, जिल्हा परिषद व नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या भाषणात वसंत पुरके म्हणाले, “लाखो लोक पक्ष सोडून गेले तरी चालतील, पण पक्षात खरे आणि निष्ठावान कार्यकर्ते असणे महत्त्वाचे आहे. कार्यकर्ता निष्क्रिय असला तरी तो प्रामाणिक असावा. पक्षासाठी लढणारा, संकटात साथ देणारा कार्यकर्ता टिकवणं हीच खरी गरज आहे.”
ते पुढे म्हणाले, “सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी आपल्याला दुप्पट आणि तिप्पट ताकद लावावी लागेल. हे शक्य आहे फक्त त्याच कार्यकर्त्यांमुळे जे कोणत्याही परिस्थितीत पक्षासोबत उभे राहतात.”
या मेळाव्यात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते उपस्थित होते. यावेळी आगामी निवडणुकांची रणनीती, संघटनात्मक बांधणी व युवकांना सक्रिय करण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी वसंत पुरके यांनी पक्षातील सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडून ठेवण्याचे आवाहन केले आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक लढा देण्याची सज्जता दर्शवली.