नागपूर – प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी अखेर आपल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला तात्पुरता विराम दिला आहे. सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवत त्यांनी २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्या वेळेत जर शेतकरी आणि दिव्यांगांसंदर्भातील मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रकृती खालावल्याने आंदोलन स्थगित-
गेल्या सात दिवसांत बच्चू कडू यांनी अन्नाचा कणही घेतला नव्हता. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली असून तब्बल ४ किलो वजन घटले. रक्तस्रावही झाल्याचे समजते. त्यांच्या आरोग्याची चिंतेची बाब बनल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. अखेर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आणि दोन दिव्यांगांच्या हस्ते त्यांनी पाणी घेत आंदोलन स्थगित केलं.
सरकारची आश्वासने-
उदय सामंत यांनी १५ दिवसांत उच्चस्तरीय समिती नेमण्याचं आश्वासन दिलं असून, दिव्यांगांच्या मानधनवाढीसाठी ३० जून रोजी विशेष बैठक घेणार असल्याचं सांगितलं. तसेच, पत्राद्वारे मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
बच्चू कडूंच्या प्रमुख मागण्या-
शेतमालाला किमान दरावर २०% अनुदान
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी स्वतंत्र मंडळ व १० लाखांची मदत
सर्व प्रकारची कर्जमाफी
दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी ६००० रुपये मासिक मानधन
ग्रामीण घरकुल योजनांसाठी किमान ५ लाख अनुदान आणि समान निकष
धनगर समाजाला आरक्षण तत्काळ लागू करणे
धनगर समाजातील बेरोजगार तरुणांसाठी नोकरीत १३% आरक्षण
प्रहारचा ‘चक्काजाम’ आंदोलन रद्द-
बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून १५ जून रोजी नियोजित ‘रास्ता रोको’ आणि ‘चक्काजाम’ आंदोलन रद्द करण्यात आलं आहे. आंदोलन मागे घेतले असले तरी “जर सरकारने फसवणूक केली, तर मंत्रालयात घुसून ‘प्रहार स्टाईल’ आंदोलन करू,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
गांधींपासून भगतसिंगपर्यंतचा प्रवास-
“२ ऑक्टोबर ही महात्मा गांधींची जयंती असली, तरी जर सरकारनं आम्हाला न्याय दिला नाही, तर आम्ही भगतसिंग होऊन मंत्रालयावर मोर्चा नेऊ,” असे सूचक आणि आक्रमक विधान करत त्यांनी आपलं आंदोलन पुढे ढकलल्याचं जाहीर केलं.