ठाणे : मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान सोमवारी (९ जून) सकाळी भीषण अपघात घडला. सीएसएमटीहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून अचानक आठ प्रवासी खाली पडले. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, दोन फास्ट लोकल एकमेकांना क्रॉस करत असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
जखमी प्रवाशांना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे कळवा, ठाणे सामान्य रुग्णालय आणि शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर रेल्वे प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “दिवा-मुंब्रा दरम्यान घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींवर तातडीने उपचार सुरू असून त्यांना लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना करतो.
मुख्यमंत्र्यांनी यासोबतच रेल्वे विभागाने या घटनेची सखोल चौकशी सुरू केल्याची माहितीही दिली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मृतांमध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या प्रकारानंतर लोकलमधील गर्दी, फास्ट ट्रेनमधील प्रवासातील असुरक्षितता आणि रेल्वेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.