नागपूर: यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा लवकरच महाराष्ट्रात दस्तक दिली. मे महिन्यात राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक भागांत मुसळधार पावसामुळे नद्या व नाले भरून वाहू लागले. मात्र सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून १२ जूनपर्यंत पावसामध्ये खंड येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवारी मुंबईमध्ये हलकासा शिडकावा झाला, परंतु रविवारी मात्र हवामान कोरडेच राहिले.
राज्यात मान्सूनची सुरुवात प्रभावी झाली असली तरी त्याचा वेग आता मंदावलेला दिसत आहे. यंदा नैर्ऋत्य मोसमी वारे अपेक्षेपेक्षा जलद आले आणि २६ मे रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडला, तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाने हजेरी लावली. मात्र मागील चार दिवसांपासून अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सूनची सक्रियता कमी झाली आहे. त्यामुळे काही भागांमध्येच हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता असून, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर मागील ४८ तासांपासून मान्सून थांबलेला आहे. नागपूर, मुंबई, पुणे आणि कोकण परिसरात पावसाचा अभाव आहे. त्यामुळे उष्णतेत वाढ झाली असून, तापमान २२ अंश सेल्सिअसवरून थेट ३८ अंशांपर्यंत पोहोचले आहे.
बियाणे पेरणीस घाई करू नका –
कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, अजून पेरणी करण्याची घाई करू नये. कारण पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १२ जूननंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. १ जूनपासून मान्सूनचा अधिकृत कालावधी सुरू होतो आणि ३० सप्टेंबरपर्यंतच्या पावसाची नोंद घेतली जाते.