नागपूर : विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण असतात अशा सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षणोत्सवाचा पंधरवाडा हा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरला असल्याचे प्रतिपादन माननीय शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले यांनी केले.
नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सोमवारी (ता. १० फेब्रुवारी) ‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ चा समारोपाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माननीय शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी होते. मंचावर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, सहायक आयुक्त श्री नरेंद्र बावनकर, क्रीडा अधिकारी श्री पियूष आंबुलकर, क्रीडा नियंत्रण अधिकारी नियंत्रण अधिकारी श्री. नितीन भोळे, शिक्षक संघाचे सचिव श्री देवराव मांडवकर, सहायक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, श्री. संजय दिघोरे, मुख्य समन्वयक विनय बगले, अनिता भोतमांगे, प्रशांत टेंभुर्णे व इतर उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणोत्सवामध्ये आयोजित विविध सांस्कृतिक क्रीडा आणि इतर स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.
नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी 22 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ चा समारोपाप्रसंगी मा. आमदार श्री सुधाकर अडबाले म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा कला गुणांचा आणि त्यांच्या सुप्त गुणांचा अधिक विकास होणार आहे. विद्यार्थ्यांना मोठे व्हायचे असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर चांगले विद्यार्थी घडू शकतात. विद्यार्थ्यांचा विकास करायचा असेल तर चार भितींच्या बाहेर जाऊन विकास करायला हवा असेही ते म्हणाले. विद्यार्थी हा आपला केंद्र असून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणे महत्वाचे आहे असेही ते म्हणाले. महानगरपालिकेची शाळा उच्च दर्जाची होऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या महिन्यात परीक्षा सुरु होणार असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षेला समोरे जावे असे मार्गदर्शन सुद्धा केले.
अध्यक्षीय भाषणात मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी म्हणाले की, ‘शिक्षणोत्सव अंतर्गत चांगल्या दर्जाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आले. जिंकणे किंवा हरणे हा ‘शिक्षणोत्सवाचा उद्देश नाही तर सर्वांचा अधिकाधिक सहभाग वाढला पाहिजे. दैनंदिन शैक्षणिक कार्यासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हा त्या मागचा उद्देश आहे. शिक्षणोत्सव अंतर्गत सहभागी असलेले सर्वजण विजेते आहेत,
शिक्षणोत्सव, क्रीडा महोत्सव सारखे उपक्रम राबवून सांघिक भावना निर्माण होते शिवाय अपयशातून बाहेर कसे यावे, हेही विद्यार्थ्यांना अशा उपक्रमातून शिकता येते. सुदृढ आणि संतुलित व्यक्ती बनण्यासाठी असे उपक्रम हातभार लावत असतात. पुढील शिक्षणोत्सव अधिक चांगल्या रितीने करू असाही विश्वास आयुक्तांनी दाखविला. शाळा विकासासाठी शिक्षक हा महत्वाचा घटक आहे. याकरिता शाळांचे मुल्यमापन केले जाईल. ज्या शाळा उत्कृष्टरित्या कार्य करतील अशा शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा सत्कार महानगरपालिकातर्फे करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यातून हेल्थी स्पर्धा सुरु होईल असा विश्वासही आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल म्हणाल्या की, गेल्या दीड वर्षांपासून शाळा आणि विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. शाळा सर्वे, पायाभूत विकास, डिजिटल क्लासरुम, नव्या क्रीडा आणि संगीत शिक्षकांची नियुक्ती यामुळे शाळांमध्ये मोठे बदल होत आहेत. एक नवीन ऊर्जा तयार झाली आहे,. आम्ही एक नवीन चेतना निर्माण करण्यात यशस्वी झालो आहोत. यामुळे शाळांच्या पटसंख्येत निश्चित वाढ होणार आहे. वर्गात शिस्त शिकता येते परंतू शिक्षणाशिवाय विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष फिल्डवर विद्यार्थी टीमवर्क, यशस्वी होण्याकरिता आणि चारित्र बांधणीकरीता आवश्यक असलेले गुण शिकू शकतात. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह महानगरपालिका शाळाचाही आत्मविश्वास वाढेल असेही श्रीमती आंचल गोयल यावेळी म्हणाल्या. परीक्षेची चांगली तयारी करा अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिल्यात.
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी केले, सूत्रसंचालन मधु पराड, शुभांगी पोहरे, प्रतिभा लोखंडे यांनी केले, तर आभार शिक्षणोत्सवचे मुख्य समन्वयक श्री. विनय बगले यांनी मानले.
सोमवारी (ता. १० फेब्रुवारी) रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात शिक्षणोत्सवाचा समारोप झाला. कार्यक्रमात सुरुवातीला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरेश भट सभागृहात आर्ट गॅलरी येथे चित्रकला, हस्तकला स्पर्धेतील उत्क़ृष्ट चित्र मॉडेल आणि विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी प्रदर्शनीचे पाहणी केली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी स्वतः पेंटींग करत मुलांचा उत्साह वाढला. त्यानंतर सभागृहात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन झाले.
जयताळा मनपा शाळा विद्यार्थ्यांमार्फत स्वागत गीत सादर करण्यात आले. त्यानंतर सावित्रीबाई फुले, सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी शिक्षणोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची व स्पर्धांची चित्रफित दाखविण्यात आली. त्यानंतर सांस्कृतिक स्पर्धेतील उत्कृष्ट समुहगान व नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. समूहगीत एम.ए.के आझाद (9ते11) आणि पारडी मराठी उच्च प्राथमिक उच्च माध्यमिक शाळा (6ते8) यांनी सादर केले. लोकनृत्य पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळातर्फे सादर करण्यात आले.
यावेळी मार्च २०२३ आणि २०२४ इयत्ता १०वी व १२वी मध्ये शाखानिहाय तसेच माध्यमनिहाय सर्व प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड कॉईन व २५००० चे धनादेश देऊन गुणगौरव करण्यात आला. त्यानंतर बौध्दीक स्पर्धेतील ६ स्पर्धामधील निवडक ६ विजेत्यांना गोल्ड मेडल देण्यात आले. सांस्कृतिक स्पर्धेतील इयत्ता ६ ते ८ वयोगटातील स्पर्धेचा प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याना गोल्ड मेडल व शाळेला मोमेन्टो (५मी) देण्यात आले.
क्रीडा स्पर्धेतील खो-खो विजेते (मुले / मुली) संजयनगर माध्यमिक शाळेला गोल्ड मेडल आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
विभागस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा मनपा नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळा येथील कु.चंचल धापडे हिने उत्कृष्ट कामगीरी करुन कांस्य पदक पटकाविले. तिचा गुणगौरव यावेळी करण्यात आला.
राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळात निवड झालयाबददल पारडी मराठी उच्च प्राथमिक शाळेची हिना कोलते हिचा गुणगौरव करण्यात आला.
युनेस्को कडून जागतीक स्तरावर आयोजीत चित्रकला स्पर्धेत पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.