अमरावती : देशातील सर्वसामान्य जनतेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचंड विरोधाची लाट आहे. त्यामुळे २००४ ला ज्याप्रमाणे भाजपाने शायनिंग इंडियाची घोषणा केली तेव्हा भाजप सत्तेवरून पायउतार झाली, तशीच परिस्थिती आता देशात असून ४ जूनला देशातील जनता पंतप्रधानांना सत्तेतून अलविदा करणार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँगेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज अमरावतीत केले.
अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीनिमित्त ते अमरावतीला आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री अॅड.यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, प्रवक्ते अॅड. दिलीप एडतकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यातील झालेल्या मतदानातून भाजप सत्तेमधून पायउतार होणार असे चित्र दिसत आहे. दक्षिणेमध्ये भाजपा पूर्णपणे साफ होईल तर उत्तर पूर्वमध्ये अर्ध्यावर येईल, असे स्पष्ट संकेत असून अब की बार ४०० पार ची घोषणा देशातील जनताच अपयशी ठरविणार असल्याचे रमेश म्हणाले. काँग्रेस पाच न्यायपत्र आणि २५ गॅरण्टीपत्रासह तत्त्वांनी या निवडणुकीला समोर जात आहे.
काँग्रेसच्या न्यापत्रामध्ये शेतकरी, शेतमजूर, नारीशक्ती, बेरोजगार युवावर्ग, कजमाफी या सर्व बाबींचा समावेश आम्ही केला असून देशातील जनताच त्याला पसंती देईल, असेही ते म्हणाले.