नवी दिल्ली : मोदी सरकारने शेतकरी आंदोलना दरम्यान ट्विटरवर अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी केला. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
इतकेच नाही तर मोदी सरकारने ट्विटरला असेही सांगितले होते की, मोदी सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांची ट्विटर अकाऊंट बंद करा. जर असे केले नाही तर भारतात ट्विटर बंद करु आणि कर्मचाऱ्यांच्या घरी छापेमारी करु अशी धमकीच आम्हाला देण्यात आली होती. सोमवारी युट्यूब चॅनल ब्रेकिंग पॉईंटला दिलेल्या मुलाखतीत जॅक डोर्सी यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
या मुलाखतीत जॅक डोर्सींना शक्तीशाली लोकांविषयी प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारबाबत हा खुलासा केला.
भारतात जेव्हा शेतकरी आंदोलन सुरु होतं तेव्हा आमच्याकडे बऱ्याच मागण्या आल्या. काही पत्रकार हे सरकारवर टीका करत होते. त्यांच्याविषयीच्या या मागण्या होत्या. एक प्रकारे आम्हाला हा इशाराच दिला गेला की आमचे ऐकले नाही तर भारतात ट्विटर बंद करु, अशी धमकी आम्हाला देण्यात आली होती.
भारत ही ट्विटरसाठी मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे आम्हाला झुकावे लागले. नाही तर आमची कार्यालयं बंद करण्यात आली असती, तसे च कर्मचाऱ्यांवर छापेमारी करण्यात आली असती. लोकशाहीचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात हे घडले असल्याचे डोर्सी म्हणाले.