Published On : Thu, Jun 11th, 2020

राजकारणातील एक सच्चा नेता काळाने हिरावला–डॉ. आशिष देशमुख

Advertisement

काटोल : काटोलचे माजी आमदार सुनील शिंदे हे पवार साहेबांचे कट्टर समर्थक आणि सहकारी होते. 10 वर्षाच्या त्यांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी संत्रा, शेतकरी व इतरांसाठी भरपूर कामे केलीत. ते एक सच्चे शेतकरी होते. शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने उचलले.

उच्च प्रतीच्या संत्रा उत्पादनासाठी व काटोल-नरखेड क्षेत्राला संत्र्याचा कॅलिफोर्निया बनविण्यासाठी यांनी प्रयत्न केले. काटोल येथे एमआयडीसी, संत्रा प्रकल्प व रिधोरा येथील जाम सिंचन प्रकल्पासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. काटोल बेळगावासाठी झालेल्या आंदोलनात ते दिल्ली येथे उपोषणाला बसले होते.

सावरगाव या त्यांच्या गावाला त्यांनी ‘टॅक्स फ्री’ ग्राम पंचायत बनविण्याचा बहुमान मिळविला होता. तेथे घराचा टॅक्स मागील पाच वर्षापर्यंत फक्त 1 रुपया घेतला जात होता. अनेक मोर्चे, आंदोलने त्यांनी यशस्वी केले होते.

त्यांच्या निधनाने राजकारणातील एक सच्चा नेता काळाने हिरावला आहे, अशी दुःखद प्रतिक्रिया माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. सुनील शिंदे यांच्या निधनाने आपली व्यक्तिगत हानी झाली आहे, असे ते म्हणाले.