Published On : Thu, Apr 2nd, 2020

गरीब व गरजू लाभार्थी धान्य वाटप योजनेपासून वंचित राहणार नाही – राऊत

Advertisement

अत्यावश्यक साहित्याच्या कीटचे वाटप कार्डधारकांना मिळणार कीट ,जास्त दराने वस्तू विकणा-यांवर कारवाई ,शहरातील विविध दुकानांची तपासणी

नागपूर : संचारबंदीच्या काळात गरीब व गरजू कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्याचे वाटप सुरु झाले असून, त्यासोबत जीवनावश्यक 18 वस्तू असलेल्या कीटचे वाटप पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते टेका झोनमध्ये आज करण्यात आले.

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना गहू व तांदूळ आदी धान्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे अंमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे. सामाजिक संस्था व जिल्हा प्रशासनातर्फे साखर, तेल, डाळ, साबण, कांदे, बटाटे आदी 18 वस्तू असलेल्या 46 हजार कीट तयार करण्यात येणार आहेत. शहरातील स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरीत करण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वितरीत करण्यात येणार असून, शासनाच्या या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी टेका झोनमध्ये राणी दुर्गावती नगर, कांजी हाऊस, कमाल चौक, इंदोरा आदी भागातील रास्त भाव दुकानांना भेट देऊन अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यात येणार आहे.धान्य पुरवठ्याची माहिती घेतली. यावेळी महिला बहुद्देशीय संस्था, यशोदिप महिला बहुद्देशीय संस्था तसेच श्रीराम किराणा या स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू असलेल्या कीट वितरीत केल्या.

458 झोपडपट्टी भागातील नागरिकांना स्वस्त धान्याचे वाटप
शहरातील गरीब तसेच अतिगरीब अशा 458 झोपडपट्ट्यांमध्ये राहणा-या कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत धान्य वितरीत करण्यात येत आहे. ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका नाही अशा नागरिकांसाठी शिधापत्रिका दुकानांमध्ये तक्रारपेटी ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिल्यात. शिधापत्रिका नसलेल्या व अंत्यत गरजू नागरिकांना स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य पुरवठा करण्यात येणार असून यासाठी शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांची माहिती एकत्र करण्याच्या दृष्टीने स्वस्त धान्य दुकानांमध्ये तक्रारपेटी ठेवण्यात येणार आहे. शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांनी आधारकार्ड, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, पत्ता आदी माहिती या तक्रारपेटीत टाकणे आवश्यक आहे. त्यानुसार अशा कुटुंबांना धान्य वितरणासंदर्भात निर्णय घेणे सुलभ होणार आहे.

संचारबंदीच्या काळात समाजातील गरीब व गरजू नागरिकांना स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वितरणासोबतच साखर, तेल, दाळ, साबन, कांदे, बटाटे, रवा, पोहे, बेसन आदी साहित्य असलेली किट जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आली आहे. यासाठी उद्योगांचा सामाजिक उत्तर दायित्त्व निधी (सीएसआर फंड) तसेच विविध संस्था, सामाजिक संस्था, व्यक्ती आदींनी दिलेल्या निधीमधून खर्च करण्यात येणार आहे. ज्या गरीबांचा रोजगार तसेच कामधंदा बंद आहे. अशा नागरिकांना ही किट देण्यात येणार आहे.

दर महिन्याला धान्याचे वितरण
लॉकडाऊन काळात शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून प्रत्येक महिन्याचे धान्य त्याच महिन्यात प्राप्त होणार आहे. सर्व अंत्योंदय व प्राधान्यगटाचे शिधापत्रिकाधारकांना माहे एप्रिलचे धान्य शासन निर्धारित दरानेच व परीमाणात प्राप्त होणार आहे. जे अंत्योदय व प्राधान्यगट योजनेचे लाभार्थी एप्रिल महिन्यात धान्याची उचल करतील त्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे अन्नयोजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीस पाच किलो तांदुळ प्राप्त होणार आहे. अंत्योदय, प्राधान्य गट लाभार्थ्यास त्याच महिन्यात मिळणार असल्याने शिधापत्रिकाधारकांनी दुकानात गर्दी करु नये.

यापूर्वी तीन महिन्याचे एकत्र धान्य वितरित करण्यात येणार होते. यामध्ये बदल करुन प्रत्येक महिन्यात शिधापत्रिका ज्यादुकानात आहे त्याच दुकानातुन धान्याचे वितरण करण्यात येणार आहे.