Published On : Wed, Jun 12th, 2019

नदी स्वच्छता अभियानांतर्गत ८५ टक्के काम पूर्ण

Advertisement

नागपूर: शहरात सुरू असलेले नदी व नाले स्वच्छता अभियान अंतिम टप्प्यात आले असून नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदी या तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाल आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापुर्वी नदी स्वच्छता अभियान राबविले जाते. यावर्षी पाच मे पासून नदी स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. रविवार (ता.९)पर्यंत शहरातील तिन्ही नद्यांचे ८५ टक्के काम पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले. नाग नदीचे एकूण १६.५० किमीचे स्वच्छता कार्य प्रस्थावित असून अंबाझरी तलाव ते पंचशील चौक, पंचशील चौक ते अशोक चौक, अशोक चौक ते केडीके कॉलेज व केडीके कॉलेज ते पिवळी नदी संगम या टप्प्यामध्ये हे स्वच्छता कार्य सुरू आहे. यामध्ये १३.९५० किमी स्वच्छता कार्य पूर्ण झाले असून ५६११ क्यूबिक मीटर गाळ बाहेर काढण्यात आला आहे.

पिवळी नदीच्या एकूण १९.८० किमी भागापैकी १७.२३३ किमी मधील ३३०७५ क्यूबिक मीटर पात्र स्वच्छ करण्यात आले आहे. पोहरा नदीच्या एकूण ४८.५० किमी पात्रापैकी ४२.५२० किमी भाग स्वच्छ करण्यात आले आहे. या भागातील १०१७२ क्यूबिक मीटर गाळ बाहेर काढण्यात आला आहे.

नाले सफाईचे कामही पूर्णत्वाकडे

नदी स्वच्छतेप्रमाणेच नाले सफाईचे कामही पूर्णत्वाकडे आले आहे. शहरातील एकूण २३९ नाल्यांपैकी मनुष्यबळाद्वारे १६१ व मशीनद्वारे ७८ नाल्यांची सफाई करायची होती. यापैकी मनुष्यबळामार्फत १५१ व मशीनद्वारे ५२ अशी एकूण २०३ नाल्यांची सफाई करण्यात आली असून ३६ नाल्यांची सफाई शिल्लक आहे. शहरातील १६३३८ आय.आर.डी.पी. चेंबरपैकी १४४५८ चेंबरची सफाई पूर्ण झाली आहे तर १८८० चेंबरची सफाई बाकी आहे.