Published On : Thu, Oct 9th, 2025
By Nagpur Today Nagpur News

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा 72 तासांचा संप सुरु; राज्यभर वीजपुरवठ्यावर संकट!

मुंबई : महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी चिंतेची बातमी आहे. राज्यातील महावितरणमधील सात कर्मचारी संघटनांनी ९ ते ११ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ३ दिवसांच्या संपाची हाक दिली आहे. खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला असून, त्यामुळे राज्यभरातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संपाचे मूळ कारण काय?

महावितरण कर्मचाऱ्यांचा रोष मुख्यत्वे खासगीकरण आणि संस्थेच्या पुनर्रचनेविरोधात आहे. ६ ऑक्टोबर रोजी अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत प्रशासनाने खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीदेखील कर्मचाऱ्यांनी आपला निर्णय न बदलता संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
संघटनांचा आरोप आहे की, ३२९ उपकेंद्रांचे खासगीकरण सुरू करण्यात आले आहे, परंतु व्यवस्थापनाने हा आरोप फेटाळून या केंद्रांचा महावितरणकडेच ताबा असल्याचा दावा केला आहे.

महावितरणची आपत्कालीन तयारी- 

संपाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत राहावा म्हणून महावितरणने युद्धपातळीवर नियोजन केले आहे. सर्व रजा रद्द करून कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यालय आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांत कंट्रोल रूम सुरू करण्यात आल्या असून, प्रत्येक तासाला वीजपुरवठ्याचा आढावा घेतला जाणार आहे.
तसेच संपात सहभागी नसलेले कर्मचारी, कंत्राटी मनुष्यबळ आणि बाह्यस्त्रोत कर्मचारी यांची नेमणूक करून पुरवठा सुरळीत ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.

Gold Rate
9 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,22,800/-
Gold 22 KT ₹ 1,14,300/-
Silver/Kg ₹ 1,54,200/-
Platinum ₹ 50,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ग्राहकांवर होणारा परिणाम- 

संपादरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्यास घरगुती, शेती, उद्योग आणि रुग्णालयांसारख्या अत्यावश्यक सेवांवर थेट परिणाम होऊ शकतो.
पाणीपुरवठा, थंडगार सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेतही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, महावितरणने अत्यावश्यक क्षेत्रांना प्राधान्याने बॅकफिडद्वारे वीजपुरवठा देण्यासाठी तयारी केल्याचे सांगितले आहे.

संपावर मेस्माचा लागू- 

वीजपुरवठा ही अत्यावश्यक सेवा असल्याने सरकारने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक कायदा (मेस्मा) लागू केला आहे. त्यामुळे हा संप बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे.
संपात सहभागी झाल्यास नवीन व कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा रद्द होऊ शकते, तर नियमित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांशी संवाद वाढवण्यासाठी दर चौथ्या सोमवारी नियमित बैठका घेण्याचे आश्वासन दिले आहे.

ग्राहकांसाठी महावितरणचे आवाहन- 

महावितरणने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
तक्रारींसाठी ग्राहकांनी खालील २४ तास कार्यरत टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा:
१९१२
१८००-२१२-३४३५
१८००-२३३-३४३५
महावितरणचे अधिकारी तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देतील, असा दावा करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement