Published On : Fri, Dec 6th, 2019

पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला 566 कोटींचा निधी

Advertisement

नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला गेल्या अडीच वर्षात 566 कोटी 23 लाख 6 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने देशातील अंगणवाडयांमध्ये पूरक पोषण आहार देवून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ‘पोषण अभियान’ राबविण्यात येत आहे. देशातील 37 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये या अभियानांतर्गत गेल्या अडीच वर्षात एकूण 4 हजार 223 कोटी 90 लाख 39 हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात केंद्राने राज्यांना वितरीत केलेल्या निधीमध्ये मागील दोन वर्षांच्या तुलनेत 950 कोटींनी वाढ झाली आहे.

महाराष्ट्राला यंदाच्या आर्थिक वर्षात 330 कोटी
महाराष्ट्राला पोषण अभियानांतर्गत या आर्थिक वर्ष 2019-20 दरम्यान आतापर्यंत 330 कोटी 61 लाख 47 हजार रूपयांचा निधी वितरीत झाला आहे. राज्याला वर्ष 2017-18 आणि 2018-19 या मागील दोन आर्थिक वर्षात एकूण 235 कोटी 61 लाख 59 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

वर्ष 2017-18 ते 2018-19 या मागील दोन आर्थिक वर्षात देशातील 37 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये या पोषण अभियानांतर्गत3 हजार140 कोटी 47 लाख 95 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला.

तर या आर्थिक वर्ष 2019-20 दरम्यान आतापर्यंत 1 हजार83 कोटी 42 लाख 44 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.