नवी दिल्ली :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज 2025 आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी अनेक घोषणा केल्या. सामान्य नागरिकांपासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत अनेकांच्या या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. अर्थमंत्री यात नेमकं काय सादर करणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या बजेटमध्ये केंद्र सरकारने कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी सर्वात मोठी घोषणा केली असून कॅन्सरची औषधे स्वस्त करण्यात आली आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पामध्ये उत्तम आरोग्यव्यवस्था पुरवण्यावर विशेष भर देणार असल्याचे सांगितले असून याच पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा केल्या आहेत. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये २०० डे केअर सेंटर उघडले जातील, त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर सेंटर सुरु केली जाणार आहेत.
तसेच जीवनरक्षक औषधांच्या किमती कमी होतील, ज्यामध्ये 36 औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे. दरम्यान, स्टार्टअपसाठी कर्जाची मर्यादा 10 कोटीवरून 20 कोटी करण्यात आली आहे. गॅरंटी फि सुद्धा कमी करण्यात आली आहे. तसेच पर्यटन क्षेत्राबाबतही सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला असून 50 नवी पर्यटनस्थळे विकसित केली जाणार आहेत. त्याचबरोबर MSME साठी लोन गॅरंटी कव्हर 5 कोटीवरून 10 कोटी करण्यात आली आहे.