Published On : Wed, Jul 25th, 2018

नागपूरच्या निर्मल नगरीत १४.३४ कोटींची फसवणूक

Advertisement

नागपूर : निर्मल उज्ज्वल सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी १४ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी मानमोडे यांच्यासह १५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रमोद नत्थुजी मानमोडे, निर्मलनगरी, नंदनवन महाव्यवस्थापक, नंदा बांते, वामनराव एस. भालवतकर रा. जयप्रकाशनगर, सत्येंजय आर. त्रिवेदी रा. रेशीमबाग, विठ्ठलराव एम. गावंडे रा. हावरापेठ, प्रदीप गोवर्धनराव राऊत रा. मोर्शी रोड अमरावती, शिवराज विजयकुमार गुजर रा. मौदा, लक्षीनारायण ड. चांडक रा. धामणगाव अमरावती, बनराव पिलाजी तिडके रा. टोली चौक सावनेर, रश्मी संजय ठाकरे रा. आशीर्वादनगर, सविता पी. बोबडे रा. वाठोडा रिंग रोड, धनंजय बालाजी धकाते रा. न्यू सहकारनगर, घनश्याम आर. गांधी रा. बाजारगाव कोंढाळी आणि प्रतिमा खाडे रा. निर्मलनगरी अशी आरोपींची नावे आहेत. प्रफुल्ल नामदेवराव करपे (४४) रा. निर्मलनगरी उमरेड रोड असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. करपे यांचा औषधांचा व्यवसाय आहे.

करपे यांच्या तक्रारीनुसार २००७ मध्ये ते रहिवासी कॉलनी निर्मल नगरीची जाहिरात पाहून निर्मल उज्ज्वल सहकारी पतसंस्थेच्या नंदनवन रोडवरील कार्यालयात गेले. तिथे त्यांना निर्मल नगरीसंदर्भात माहिती पुस्तिका देण्यात आली. पुुस्तकात २१ एकर क्षेत्रात हा निवासी प्रकल्प साकार होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच यामध्ये मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, खेळाचे मैदान, मेडिकल सेवा, क्लब हाऊस, सांस्कृतिक भवन, उद्यान आदींचाही उल्लेख करण्यात आला होता.

करपे यांनी २ जानेवारी २००८ रोजी १९ लाख २ हजार ५०० रुपयात रो हाऊस बुक केले. २० फेब्रुवारी २०१३ रोजी त्यांना विक्रीपत्र देण्यात आले. रो हाऊसचा ताबा घेण्यासाठी गेले असता त्यांना वन टाईम मेंटनेन्सच्या नावावर १ लाख २५ हजार रुपये, विकास आणि वीज शुल्कापोटी ८१ हजार ८२२ रुपये, वॉटर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ९७६५ रुपये भरण्यास सांगण्यात आले. ही रक्कम भरल्याशिवाय रो हाऊसचा ताबा मिळणार नाही, असे सांगण्यात आले. नाईलाजास्तव सव्वा लाख रुपये जमा केल्यावर ताबा देण्यात आला. करपे यांच्याप्रमाणेच कॉलनीतील इतर लोकांकडूनही पैसे घेण्यात आले.

करपे यांच्या तक्रारीच्या आधारावर सक्करदराचे एसपी रवींद्र कापगते यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलीस तपासात निर्मल उज्ज्वल को-आॅपरेटिव्ह सोसायटीमध्ये गुंतवणूकदारांनी जमा केलेल्या रकमेतून आरोपींनी स्वत: किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर कर्ज घेतल्याचे आढळून आले. हे कर्ज बुडाल्याने त्याच्या वसुलीसाठी कुठलेही प्रयत्न झाले नाही. त्याचप्रकारे निर्मल उज्ज्वलचे प्रमुख प्रमोद मानमोडे तथा संचालक मंडळाने निर्मल उज्ज्वल पतसंस्थेच्या नावावर २१ एकर जमिनीवर निर्मल नगरी नावाने रहिवासी प्रकल्प तयार केला. या ठिकाणी रो-हाऊससह ७२५ फ्लॅट्सचे बांधकाम करण्यात आले.

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रकल्पाच्या माहिती पुस्तिकेत आकर्षक सुविधांचा उल्लेख करण्यात आला. २१ एकर जमिनीऐवजी १७ एकरमध्येच हा प्रकल्प साकारण्यात आला. फ्लॅट व रो-हाऊसच्या बुकिंग दरम्यान गुंतवणूकदारांकडून कुठलेही अतिरिक्त शुल्क वसुलीबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नाही. नंतर फ्लॅट आणि रो-हाऊसधारकांकडून इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर चार्ज आणि वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जच्या नावावर बळजबरीने १४ कोटी ३४ लाख ५४० रुपयांची वसुली करण्यात आली.

याप्रकारे आरोपींनी निर्मलनगरीत फ्लॅट आणि रो-हाऊस खरेदी करणाऱ्यांची सोसायटी स्थापन न करता त्यांनी दिलेली रक्कम परस्पर वापरली. तसेच जमीनही त्यांच्या नावाने केली नाही. करपे यांची तक्रार व चौकशीच्या आधारावर नंदनवन पोलिसांनी बुधवारी भा.दं.वि. कलम ४२०, ४०९, ३८४, ३४ तसेच महाराष्ट्र मालिक अधिकार फ्लॅट अधिनियम १९६३ चे कलम ३, ५, ७, १०, ११ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने पाठवली तक्रार
सूत्रानुसार करपे यांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार केली होती. परंतु पोलीस कुठलीही कारवाई करीत नसल्याने १० फेब्रुवारी रोजी त्यांनी सीबीआयकडे तक्रार केली. सीबीआय अधीक्षक विजेंद्र बिदारी यांनी ही तक्रार पोलीस आयुक्तांकडे पाठवली. यानंतर पोलिसांनी हालचाल सुरू केली. पोलीस आयुक्तांनी झोन चारचे डीसीपी नीलेश भरणे यांच्याकडे ही तक्रार पाठवली. प्रकरण गंभीर असल्याने भरणे यांनी एसीपी रवींद्र कापगते यांच्याकडे तपास सोपवला. या आधारावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोप तथ्यहीन – मानमोडे
‘‘ निर्मल नगरीच्या संबंधात नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीबाबत आजच माहीत पडले. ही तक्रार बोगस आहे आणि यात करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत. निर्मल नगरीत आम्ही लोकांना घर बनवून विकले आहेत. अशावेळी १४ कोटी रुपये कुठल्या गोष्टीचे ही गोष्ट समजण्यापलिकडे आहे. पोलिसांकडून या तक्रारीबाबत अधिक माहिती घेतल्यानंतरच यावर आणखी काही सांगता येईल.’’