Published On : Tue, Jun 23rd, 2020

लॉकडाऊनमध्ये घरगुती विजेचा वापर वाढला, बिलाचे हप्ते पाडून देणार : ऊर्जामंत्री

Advertisement

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांत अनेक ग्राहकांना वीज बिलाचा ‘शॉक’ बसला आहे. आधीच कोरोनात रोजगाराचं संकट, त्यात वीज बिल जास्त आल्यानं अनेकांवर मोठं संकट ओढवलं आहे. लॉकडाऊनच्या काळात विजेचा घरगुती वापर जास्त झाला आहे. शिवाय विजेचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना विजेचं बिल जास्त आलं आहे. (Minister Nitin Raut on electricity Bill)

जास्त वीज बिल आलेल्या ग्राहकांना महावितरणकडून बिलाचे हप्ते पाडून देण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. वीज बिलाबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक असल्याचंही त्यांनी सांगितलं. (Minister Nitin Raut on electricity Bill)

नितीन राऊत म्हणाले, “लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही बिलं लॉकडाऊनमधील तीन महिन्याची आहेत. लॉकडाऊनमध्ये विजेचा वापर जास्त झाला. टीव्ही, फॅन यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढला. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढतेच. दुसरी गोष्ट म्हणजे MERC ने एप्रिलमध्ये विजेचे दर वाढवले आहेत. ते दर लागू झाले आहेत. मागील वर्षीच्या या महिन्याच्या बिलाची आणि यंदाच्या बिलाची तुलना करुन पाहिली तरीही हे वीज बिल माफक आहे हे लक्षात येईल”.

आज दुपारी मुंबईत याबाबत बैठक होत आहे. या बैठकीत आम्ही चर्चा करुन, वीज ग्राहकांना दिलासा कसा देता येईल, असा निर्णय घेऊ, असंही नितीन राऊत यांनी सांगितलं.

वीज ही अत्यावश्यक असली, तरी त्याचे दर सरकार ठरवत नाही, ते दर MERC ठरवते. खासगी उद्योगाकडून केंद्र सरकारच्या मार्फत वीज घेऊन आम्ही ती ग्राहकांना पुरवतो. त्यामुळे वीजेचे दर वाढले तर आम्ही देणार नाही हे म्हणणं योग्य नाही. वीज जेव्हा वापरतो, तेव्हा त्याचं बिल द्यायला हवं. आम्ही ग्राहकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, ज्या उद्योगांचं वीज बिल समजा दहा हजार रुपये आलं असलं, तरी त्यापैकी काही रक्कम भरली तरी त्यांची वीज कट केली जाणार नाही, याची दक्षता आम्ही घेत आहोत, असं आश्वासन नितीन राऊत यांनी दिलं.