Published On : Sat, Jun 1st, 2019

राज्यातले सिंचनाचे सगळे प्रकल्प पूर्ण करणार-गडकरी

Advertisement

नागपुर: राज्यातले सगळे सिंचनाचे सगळे प्रकल्प पूर्ण करणार अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या नागपुरातल्या पत्रकार परिषदेत केली आहे. लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर नितीन गडकरी नागपुरात आले. तिथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी विजयानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सिंचनाचे सगळे प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं म्हटलं आहे. देशाचा जीडीपी वाढवणं आणि रोजगार निर्मिती करणं हा महत्त्वाचा मुद्दा आमच्या दृष्टीने आहे.

लघू उद्योग आणि रोजगार निर्मिती करणं हे माझ्यापुढचं लक्ष्य आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. अजून कोणतंही टार्गेट सेट केलेलं नाही. नवीन योजना आणायच्या आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. विविध भागात रस्त्यांची कामं सुरू करण्यात आली आहेत. रस्त्यांच्या लगत १२५ कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचं लक्ष्य आहे असंही गडकरींनी म्हटलं आहे. येत्या तीन वर्षात सगळ्या महामार्गांची कामं पूर्ण होतील असंही त्यांनी म्हटलं आहे. खादी ग्रामोद्योग, कृषी क्षेत्रात रोजगार निर्मिती करणार आहे असेही गडकरी यांनी म्हटलं आहे. खादीची निर्यात, मधाची निर्यात वाढवणं हे सध्या लक्ष्य ठेवलं आहे असंही गडकरींनी स्पष्ट होतं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच गडकरी नागपुरात आले आहेत. माझं काम जास्तीत जास्त करणार, मी सर्वाधिक कार्यक्षम मंत्री आहे की नाही हे लोकांनी ठरवायचं आहे. मी स्वतः जेवढं काम करायचं तेवढं करत रहाणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

मार्च २०२० पर्यंत गंगा शुद्धीकरणाचं काम करणार असल्याचंही गडकरी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. रोजगारनिर्मितासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे तसेच इतर मंत्र्यांनाही मी माझ्या परिने सहकार्य करणार आहे असंही गडकरींनी स्पष्ट केलं आहे.