नागपूर : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महिला आरक्षण विधेयक आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत भाजपवर घणाघाती हल्ला केला.
नागपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी सांगितले की, 106 वी घटना दुरुस्ती मंजूर होऊन महिला आरक्षणाला मान्यता मिळालेली असताना पुन्हा नव्या दुरुस्तीचा प्रयत्न का केला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी आरोप केला की, सरकार जनगणना आणि परिसीमनाच्या अटी जोडून महिला आरक्षणाची अंमलबजावणी लांबवत आहे. “महिला आरक्षण आधीच मंजूर आहे, तरीही त्याला उशीर का लावला जातोय, हे समजत नाही,” असे ते म्हणाले.
वडेट्टीवार यांनी पुढे म्हटले की, लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना, आरक्षणाची अंमलबजावणी आणि जनगणनेच्या अटी यामध्ये सरकारकडून राजकीय डाव खेळला जात असल्याचा आरोप आहे. त्यांनी असेही म्हटले की, या प्रक्रियेत लोकशाही व संविधानाच्या मूळ तत्त्वांवर परिणाम होत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेच्या भूमिकेबाबत बोलताना त्यांनी आघाडीतील समन्वयावर चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले. तसेच, काँग्रेसला काही जागा मिळाव्यात अशी मागणीही त्यांनी मांडली.
सोलर वीज शुल्क आणि आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाढत्या करांमुळे सामान्य नागरिकांवर भार वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपच्या आंदोलनावर टीका करताना त्यांनी म्हटले की, “महिला आरक्षणाच्या नावाखाली राजकीय दिखावा केला जात आहे,” तसेच आंदोलनातील काही घटनांचा उल्लेख करत भाजपवर पुन्हा निशाणा साधला.
याच पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर, काँग्रेसविरोधी भूमिकेवर आणि लोकशाही प्रक्रियेवरही अनेक प्रश्न उपस्थित केले.









