Published On : Mon, Aug 9th, 2021

वर्धा जिल्ह्यात सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा उभारणार!

Advertisement

‘संवाद यात्रे’त बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजनेंचा हुंकार

वर्धा– देशात सामाजिक परिवर्तन घडून आणण्याकरिता ज्याप्रमाणे मा.कांशीराम साहेबांनी सर्वसमावेशकते साठी उत्तर प्रदेशाला देशाची प्रयोगशाळा बनवण्याचे काम केले त्याचप्रमाणे महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात बसपा सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा उभारेल. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ हे उद्देश पुर्ण करण्यासाठी राज्याला दिशा देणारा जिल्हा अशी ओळख त्यामुळे वर्धेची निर्माण होईल, असा दावा बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी रविवारी वर्धा येथील (सेलू) आयोजित ‘संवाद यात्रे’च्या सभेत केले. पक्षातर्फे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या सुन सावित्रीबाई साठे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

पुढे बोलतांना अँड.ताजने म्हणाले की, अण्णाभाऊ साठेंच्या स्वप्नपूर्तीसाठी बसपा कटिबद्ध आहे. महापुरूषांच्या आंदोलनाला गती देण्यासाठी मा.कांशीराम जी व मायावती जी यांनी तहहयात बहुजन महापुरुषांचा सन्मान केला.केवळ बसपामध्येच सर्व महापुरुषांचा सन्मान होवू शकतो. त्यामुळे केवळ मांतग समाजाने मातंग समाजाला जोडून मातंग समाजाचे कल्याण होणार नाही. चर्मकार समाजाने चर्मकार समाजाला जोडून चर्मकार समाजाचे कल्याण होणार नाही. अशात ज्या जातींना जातीच्या आधारे तोडण्यात आले त्यांना जातीच्या आधारे एकत्रित करून अल्पसंख्यांक समाजापासून बहुजन समाजापर्यंत नेण्याची प्रक्रिया कांशीराम साहेबांनी सुरू केली. हीच प्रक्रिया राज्यामध्ये कॅडर प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून सुरू केली जाईल. येत्या १७ ते २० ऑगस्ट दरम्यान हिंगणघाट, आर्वी, पुलगाव आणि देवरी या चार विधानसभा मतदार संघात कॅडर कॅम्पचे आयोजन केले जाईल, असे अँड.ताजने म्हणाले.

कार्यक्रमात बसपाचे कार्यक्रमात बसपाचे प्रदेश महासचिव सुनील डोंगरे, रोहन राईकवार, अनोमदर्शी भैसारे, जिल्हा महासचिव अविनाश वानखेडे, प्रदेश सचिव सुनील देशमुख, ओबीसी नेते मनोज माहुरे, जिल्हा परिषद सदस्य मनीष पुसाटे, हेमलता ताई शंभरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील हजारे, झोन प्रभारी इंजि.नितेश कांबळे, कोषाध्यक्ष नाझिम शेख ,बबनराव बनसोड, पी.एस.खंदारे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अण्णाभाऊंचा सन्मान केवळ बसपानेच केला-सावित्रीबाई साठे
अण्णाभाउ साठे यांचा सन्मान आणि त्यांच्या कुटुंबियांचे मान-पान ,सन्मान करणारा पहिला पक्ष बहुजन समाज पार्टी आहे. बसपानेच वाटेगाव या मुळगावी घर बांधून दिले आहे. आम्हच्या कुटुंबियांच्या मागे उभे राहणारे कांशीराम जी पहिले नेते आहेत, अशी भावना सावित्रीबाई साठे यांनी यावेळी व्यक्त केली.

…स्वाभीमानाने सत्तेसाठी संघर्ष करा- मा.प्रमोद रैना
ओबीसी समाज जोपर्यंत महाराष्ट्रात स्वाभीमानाने सत्तेसाठी संघर्ष करणार नाही तोपर्यंत येथील प्रस्थापित राजकीय समाज ओबीसींना स्वत:च्या पायावर उभे राहू देणार नाही. त्यामुळे इतर मागासवर्गीय समाजाने बीएसपीच्या निळ्या झेंड्याखाली एकत्रित यावे. जेणेकरून त्यांना मान-सन्मान देण्याचे काम सुश्री. बहन मायावती करू शकतील, असे आवाहन पक्षाचे प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना यांनी सभेतून केले.