नागपूर – महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? त्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असल्याने त्यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारत निर्वाचन आयोग यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील ९ नियमित जागा आणि एका पोटनिवडणुकीसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल, तर त्याच दिवशी निकालही जाहीर करण्यात येणार आहेत.
सध्याच्या विधानसभा संख्या बलानुसार भारतीय जनता पार्टी ला ५, शिवसेना ला २, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ला १ आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनाच उमेदवारी दिली जाईल का, यावरच संपूर्ण राजकीय समीकरण अवलंबून आहे.
महायुतीकडे सध्या भक्कम संख्या बल आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, तसेच सुनेत्रा पवार यांच्या गटासह भाजपकडे एकूण बहुमत असल्याने महायुतीचे ८ उमेदवार विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या एकूण ४६ आमदारांमुळे त्यांना एक जागा निश्चित मानली जात आहे. मात्र दुसऱ्या जागेसाठी आवश्यक अतिरिक्त १० मते मिळवणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, जर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर सत्ताधारी भाजप बिनविरोध निवडणुकीचा पर्यायही पुढे करू शकते. त्यामुळे ठाकरे यांचा अंतिम निर्णय हा या निवडणुकीतील सर्वात मोठा ‘टर्निंग पॉइंट’ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









