Published On : Thu, Jun 25th, 2020

वीडियो : एसबीआय इम्प्लाॅईज क्रेडिट को. ऑप . सोसायटीमध्ये अडकले शेकडो सभासद ठेवीधारकांचे पैसे

Advertisement

— ठेवी परत करण्याकडे पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

नागपूर : मोहन नगर भागातील एसबीआय क्रेडिट को. ऑप . सोसायटीच्या संचालक मंडळामार्फत नागपूरसह बाहेरगावातील शेकडो सभासद ठेवीदारांच्या ठेवी मुदत संपल्यानंतरही परत करण्यात आल्या नसल्याचा आरोप काही ठेवीदारांनी केला आहे. अशा ठेवीदारांची संख्या 500 पेक्षा जास्त असून सोसायटीने जवळपास 10 कोटी रुपयांची एकूण ठेवी परत केली नसल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना लेखी आणि तोंडी स्वरूपात दिली आहे.

ठेवीदार डाॅ. प्रदीप येळणे च्या माहितीनुसार, स्टेट बॅंक ऑफ इंडियात कार्यरत असलेले शेकडो कर्मचारी त्यांच्या वेतनातील ठराविक रक्कम दर महिन्याला एसबीआय एम्पाॅइज सोसायटीत ठेव स्वरूपात जमा करतात. त्यांना सेवानिवृत्तीनंतर पुढील जीवन व्यतीत करण्यासाठी या रकमेचा लाभ व्हावा, हा यामागील उद्देश असतो. मात्र, मागील काही वर्षांपासून सोसायटीच्या संचालक मंडळाने केवळ त्यांच्या मर्जीतील सभासद ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या.

सध्या त्यांच्या बिनमर्जीतील अनेक ठेवीदार सोसायटीच्या मोहन नगर येथील कार्यालयात रक्कम परत मिळविण्यासाठी चकरा मारतात, अध्यक्ष-सचिवांशी भेटून त्यांना ठेवी परत करण्यासाठी विणवनीसुद्धा करतात. परंतु, या ठेवीदारांना संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ वेगवेगळी कारणे सांगून परत पाठवितात. ते काही ठेवीदारांना तुमचे पैसे लवकरच परत करू असे सांगून त्यांची बोळवण करतात. एसबीआय एम्पलाॅईज सोसायटीच्या अध्यक्षांकडे काही सभासद ठेवीदारांनी लेखी स्वरूपात अर्ज करून रक्कम परत मागितली. मात्र, त्याचा काहीही लाभ झाला नसल्याचे मत अर्जदार डाॅ. प्रदीप येळणे यांनी आमच्या प्रतिनिधीला लेखी स्वरूपात दिले. त्यांनी आमच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत संस्थेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे.

ते स्टेट बॅंक आॅफ इंडियातून सप्टेंबर, 2019 ला चीफ असोसिएट पदावरून सेवानिवृत्त झाले. नोकरीकाळात त्यांनी सोसायटीत ठेव जमा केली. ते याच सोसायटीत एकेकाळी पदाधिकारीसुद्धा होते. नियमानुसार त्यांना त्यांची ठेवी ठराविक अवधीत परत मिळणे अपेक्षित होते. मात्र, सोयायटी व्यवस्थापनामार्फत अर्जदार डाॅ. येळणे यांना आतापर्यंत त्यांच्या ठेवीतील एक रूपयाही देण्यात आलेला नाही. याविषयी त्यांनी संस्थेचे अध्यक्ष मेश्राम यांना पत्र लिहून त्यांची ठेवी परत करण्याची विनंतीही केली. परंतु, मागील 7 महिन्यांपासून त्यांना अद्यापही ठेवी परत करण्यात आलेली नाही. हीच स्थिती सोसायटीचे माजी पदाधिकारी मार्केंडेय लुळे आणि यशवंत आंबेकर यांचीही आहे. त्यांनाही सभासद ठेवी परत मिळाल्या नसल्याने ते आर्थिक विवंचनेत अडकले आहेत.

एसबीआय क्रेडिट को. आॅप. सोसायटीचा कारभार नियमाला अनुसरून नसल्याचे रतन चांडक अॅण्ड कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट सुधीर बाहेती यांनी 1/08/2018 रोजी जाहीर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. संबंधित सोसायटीच्या आर्थिक कारभाराविरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सहकार खात्याचे (दिल्ली/पुणे) संबंधित वरिष्ठ अधिकारी गौतम वालदे यांना सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांची चैकशी करण्याकरिता पाठविण्यात आले

होते. वालदे यांनी जाहीर केलेल्या चैकशी अहवालात एसबीआय क्रेडिट को. आॅप. सोसायटीच्या संचालक मंडळाचा कारभार मनमानी स्वरूपाचा असल्याची नोंद करण्यात आली असून याचा अहवाल नागपूर टूडेच्या हाती लागला आहे. एवढे सबळ प्रकरण असतानासुद्धा सहकार खाते विभागाने एसबीआय क्रेडिट को. आॅप. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध अद्यापतरी कोणतीही कारवाई केलेली नाही. अर्जदाराने ठेव परत मिळावी म्हणून एसबीआय बॅंक व्यवस्थापनाला या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी विनंतीही केली. परंतु, या प्रकरणी पाहिजे तसे सहकार्य मिळाले नसल्याचे येळणे यांनी सांगितले. मुख्य म्हणजे, आमच्या चमूंनी अन्य ठेवीदारांशी संपर्क साधला असता त्यांनीसुद्धा त्यांच्या लाखो रूपयांच्या ठेवी वर्षे उलटले तरी परत मिळाल्या नसल्याचे मान्य केले.

यासंदर्भात ‘नागपूर टुडे’ यांना माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष वज्राबोधी मेश्राम म्हणाले की सोसाइटी तोट्यात आहे आणि सदस्यांचे पैसे संस्थांकडून परत केले जातील. मेश्रामनी सांगितले की सोसायटीच्या कार्यकारी सभासदांवर न्यायालयीन खटले सुरु आहेत.