
नागपूर : आरोप-प्रत्यारोप, टपाल मतदानावरील वाद आणि राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चांनी गाजलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर गिरीश गांधी यांनी दणदणीत विजय मिळवत अध्यक्षपदावर कब्जा केला. या निकालामुळे विद्यमान अध्यक्ष प्रदीप दाते आणि श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून संघाच्या सत्तासमीकरणात मोठी उलथापालथ झाली आहे.
मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात गिरीश गांधी यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली. गांधी यांना २६६१ मते मिळाली, तर प्रदीप दाते ११८७ मतांवर थांबले. श्रीपाद जोशी यांना ७०१, डॉ. रवींद्र शोभणे यांना २०५, तर डॉ. रंजन दारव्हेकर यांना ११४ मते मिळाली. पहिल्या फेरीपासूनच गांधी यांनी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम ठेवत प्रतिस्पर्ध्यांना दूर लोटले.
टपाल मतदानावरून निर्माण झाला वाद-
यंदाच्या निवडणुकीत टपाल मतदानाचे प्रमाण मोठे होते. संघाकडून ७,४९३ मतदारांना मतपत्रिका पाठवण्यात आल्या होत्या. मात्र त्यापैकी तब्बल २,००७ मतपत्रिका चुकीच्या पत्त्यांमुळे परत आल्याने व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अखेरीस ४,९३५ मतदारांनी मतदान केले. त्यात १,५२९ मतपत्रिका टपालाद्वारे, ५०५ मतदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून, तर २,८३१ प्रतिनिधीमार्फत मतदान केले. सुमारे १,५०० मतदार मतदानापासून दूर राहिल्याचेही स्पष्ट झाले.
राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपांनी तापले वातावरण-
निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही उमेदवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे साहित्यविश्वातही राजकीय छाया पडल्याची चर्चा रंगली. मात्र गडकरी यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत या निवडणुकीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
मतपत्रिका तस्करीचा आरोप-
मतदानाच्या प्रक्रियेत मतपत्रिकांची कथित तस्करी झाल्याचा आरोप करण्यात आल्याने निवडणूक अधिकच वादग्रस्त ठरली. त्यामुळे ही निवडणूक केवळ साहित्य संघाची न राहता प्रतिष्ठेची लढत बनली होती.शनिवारी सायंकाळी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर रविवारी नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाच्या मुख्य कार्यालयात मतमोजणी झाली आणि अखेर गिरीश गांधी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
पाच वर्षांसाठी गांधींचे नेतृत्व-
१ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या कालावधीसाठी अध्यक्ष आणि २२ सदस्यीय कार्यकारिणीची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी पाच उमेदवार मैदानात होते, तर चार पॅनेल्स आणि अपक्ष मिळून ८३ उमेदवारांनी कार्यकारिणीसाठी निवडणूक लढवली. आरोप-प्रत्यारोप, टपाल मतदानावरून निर्माण झालेला गदारोळ आणि तीव्र राजकीय रंग चढल्याने यंदाची निवडणूक विदर्भातील साहित्यविश्वात मोठ्या चर्चेचा विषय ठरली.








