
नागपूर : अवकाळी मुसळधार पावसाने नागपूर शहरासह विदर्भातील विविध भागांना जोरदार तडाखा दिला असून, कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात उघड्यावर ठेवलेली शेकडो पोती धान्य भिजून मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गहू, तूर, सोयाबीन यांसारख्या शेतमालाची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे.तसेच मध्यरात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
बाजार समिती प्रशासनाची हलगर्जी?
बाजार समितीत पुरेशा गोदामांची आणि साठवणुकीची सुविधा नसल्यामुळे अनेक व्यापारी व शेतकऱ्यांना धान्य उघड्यावर ठेवावे लागते. याच पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या पावसाने उघड्यावर ठेवलेली शेकडो पोती पूर्णतः भिजली. यामुळे धान्याची गुणवत्ता खालावली असून बाजारभावावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
अवकाळी पावसाचा विदर्भाला फटका-
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, पारडी आणि आसपासच्या भागांत गारपिटीने हजेरी लावली. अचानक कोसळलेल्या गारांमुळे शेतातील उभी पिके आडवी झाली. विशेषतः हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पंचनाम्याची मागणी केली आहे.
हवामान अंदाजाकडे दुर्लक्ष?
हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिलेला असतानाही बाजार समिती प्रशासनाकडून कोणतीही ठोस खबरदारी घेतली गेली नाही, अशी टीका होत आहे. योग्य वेळी ताडपत्री किंवा साठवण व्यवस्था उपलब्ध करून दिली असती, तर नुकसान टाळता आले असते, असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
शेतकरी पुन्हा संकटात-
शेकडो पोती धान्य भिजल्याने त्याची प्रतवारी कमी होणार असून, शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाचे दुहेरी संकट कोसळले आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.








