मुंबई : शिवसेनेचा 51वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी पार पडला. या सोहळ्यादरम्यान पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा करता येत नसेल तर समान नागरी कायदा कसा करणार असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
भाजपने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली आहे. यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य करताना म्हटलं की, राष्ट्रपतीपदावर मतांचे राजकारण नव्हे तर देशाचे भले करणारा उमेदवार दिल्यास आमचा भाजपला पाठिंबा असेल. केवळ मतं डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार देणं, हे मोदींचं राजकारण आहे. मतांसाठी राष्ट्रपतीपदाचं राजकारण करणं, हे शिवसेनेला मान्य नाही.
मध्यावधी निवडणुकीची आम्हाला पर्वा नाही. पण शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याची चिंता आम्हाला अधिक आहे. मध्यवधीसाठी शिवसैनिक वणव्यासारखा पेटून उठेल. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या, तुमच्या छाताडावर भगवा फडकवू असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- पाठीत वार कराल तर उलटून तुमच्या छाताडावर वार करू
- हिम्मत असेल तर मध्यावधी घ्या
- मध्यावधी लागल्या तर प्रत्येक शिवसैनिक ठिणगी नाही तर वणव्यासारखा पेटून उठेल
- मला मध्यावधीची पर्वा नाही, मला जास्त चिंता ही आयुष्य मधेच सोडणा-या शेतक-यांची चिंता जास्त आहे
- एक तरी राष्ट्रीय पक्ष मराठी भाषिकांवरील अत्याचारावर बोलतोय?
- कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रात कानडी सरकार मराठी बांधवांवर भाषिक अत्याचार करतायत
- ज्यांना मोठं केलं त्यांनी उलटून वार केले
- दलितांच्या मतांसाठी दलित राष्ट्रपती नको
- मतांचा विचार करून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नको
- मतांचं राजकारणात शिवसेना पडू शकत नाही
- राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबद्दल उद्या बोलणार
- शेतक-यांचं भलं व्हावं म्हणून आम्ही राष्ट्रपतीपदासाठी स्वामिनाथन यांचं नाव सुचवलं होतं
- हिंदू राष्ट्र आहे, म्हणून आम्ही मोहन भागवतांचं नाव सुचवलं होतं
- दलित समाजाची मतं घेण्यासाठी जर दलित राष्ट्रपती देणार असाल तर शिवसेना पाठिंबा देणार नाही
- रामनाथ कोविंद यांच्या नावावर उद्या निर्णय घेणार